मुंबई : भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीची भावना असली तरी भिवंडीच्या बदल्यात सातारा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दर्शविली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी म्हणून आग्रह करण्यात येत आहे. 

सातारा मतदारसंघ हा १९९९ पासून गेली २५ वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. १९९९ आणि २००४ मध्ये लक्ष्मणराव पाटील तर २००९ ते २०१९ या काळात उदयनराजे भोसले निवडून आले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादीच्या वतीने जिंकली होती. पण निवडून आल्यावर चारच महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केल्यास खासदारकीचा राजीनामा दिला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये सातारा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. यंदा श्रीनिवास पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास उत्सुक नाहीत. साताऱ्यात राष्ट्रवादीमध्ये तीन जणांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा आहे. शरद पवार गटाने सात उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी पक्षाच्या हक्काच्या सातारा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही.

हेही वाचा >>>‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून लोकसभा लढावी, असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. आपण राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढणार नाही, हे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यावर चव्हाण यांच्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दर्शविल्याचे सांगण्यात येते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्कालीन कराड मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. चव्हाण हे उमेदवार असल्यास नक्कीच फरक पडेल, असेही राष्ट्रवादीचे गणित आहे. यासाठीच राष्ट्रवादीचा आग्रह आहे. काँग्रेसमध्ये साताऱ्याची जागा लढविण्याबाबत विचार सुरू झाला आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

सांगलीच्या जागेवरील हक्क  कायम – डॉ. विश्वजित कदम

सांगली :बरोबर आले तर काँग्रेससह अन्यथा काँग्रेसशिवाय लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिल्यानंतरही काँग्रेसने सांगलीच्या जागेवरील आपला हक्क कायम असल्याचे सांगत पक्षश्रेष्ठींनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी  सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगलीच्या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय जाहीर होईल, असे आज स्पष्ट केले. डॉ. कदम म्हणाले,  सांगलीच्या जागेवर गुणवत्तेनुसार काँग्रेसचाच हक्क असून कोणत्याही स्थितीत आमचा दावा आम्ही अद्याप मागे घेतलेला नाही असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

उदयनराजे आग्रही

उदयनराजे उमेदवारीसाठी आग्रही असले तरी भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. पक्षाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने त्यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. उदयनराजे राज्यसभेचे खासदार असून, त्यांची मुदत २०२६ पर्यंत आहे. अजून दोन वर्षे खासदारकी शिल्लक असताना लोकसभेवर दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी, असा राज्याच्या नेतृत्वाचा प्रवाह होता.