Sharad Pawar on Emergency : देशात आणीबाणी लावली जाण्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे आणीबाणीला विरोध दर्शवण्यात येतो आहे. भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. तसंच आता त्या आणीबाणीला ५० वर्षे झाली आहेत. मागील दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच शरद पवार यांनीही आणीबाणीबाबत वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, “वृत्तपत्रात जे काम करतात त्यांना माहीत असेल. बाकीच्यांना माहिती नाही. जी वृत्तपत्रं त्यांचं स्वच्छ मत मांडतात ते सरकारच्या विरोधात असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. ही बातमी छापू नका. सरकार विरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायची असेल तर नंतर काही झालं तर आमच्याकडे येऊ नका. हे सांगत एक प्रकारे धमकीच दिली जाते.”
घोषित आणि अघोषित आणीबाणी यात फरक करण्याची वेळ
घोषित आणि अघोषित आणीबाणी यात फरक करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. पुन्हा सगळ्यांना सावध राहण्याचा काळ आला आहे. संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टीकोन घेऊनच पुढे उभे राहू, त्यासाठी वाट्टेल ती किंमत देऊ असंही शरद पवार म्हणाले. एवढंच नाही तर आणीबाणी जरी इंदिरा गांधींनी लावली होती तरीही पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली होती ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली होती आणि चित्र बदललं होतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
१९७५ मध्ये देशात आणीबाणी
२५ जून १९७५ ला इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर देशात सुमारे १८ महिने आणीबाणी होती. या सगळ्याचा विरोध जयप्रकाश नारायण आणि इतर उजव्या विचाराच्या सगळ्याच नेत्यांनी केला होता. तसंच आणीबाणी लागल्यानंतर बराच संघर्षही झाला होता. अनेक संस्थांवर बंदी घालण्यात आली होती. वृत्तपत्रांवरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आणीबाणी संपल्यानंतर जी निवडणूक झाली त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आणि भाजपाने ही संविधानाची हत्या असल्याचं म्हटलं होतं. आता शरद पवार यांनीही घोषित आणि अघोषित आणीबाणीबाबत भाष्य केलं.