Sharmila Thackeray Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते बांधकामात भ्रष्टाचार होत असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीही भ्रष्टाचार झाल्याने त्यांनी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मला इतकं दुखं होतंय ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभी आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा.”

हेही वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj Statue : आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “ही व्यवस्था…”

“मुंबई-नाशिक रस्त्यात भ्रष्टाचार झालाय. तिथे खड्डे आहेत. मुंबई-गोवासाठी तर आम्ही आंदोलन करून थकलो. कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत की ते अजूनही त्यांना मतदान करतात. जो पुतळा पडला तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोण उभा करतो?”, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

“शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेले विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ते तर कधीच पडले पाहिजे. त्याची तटबंदी अजूनही चांगली आहे. साडेतीनशे वर्ष जुना असल्याने त्याची आतमध्ये पडझड झाली असेल. पण तुमचा पुतळा आठ महिन्यात पडतो. छत्रपतींना तरी सोडा. तुम्ही चांगल्या कंपन्या घ्या आणि चांगले रस्ते तरी बनवायला सांगा”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंनीही व्यक्त केला होता संताप

राज ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती?”.