गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडली, असं काही बंडखोर आमदारांनी जाहीरपणे म्हटल्यानंतर संजय राऊतांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेषत: बुधवारी संध्याकाळी संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रश्नांवर नो कमेंट्स असं म्हणत दीड मिनिटांत संवाद आटोपल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

“जेव्हा त्यांनी मुंबईतून पलायन केलं, तेव्हा ते म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष निधी देत नव्हता म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या वेळी त्यांनी सांगितलं की पक्षातले काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून बाहेर पडलो. आता चौथ्या वेळा ते माझं नाव घेत आहेत. नेमका त्यांनी पक्ष का सोडला, त्यांनी हे पाऊल का उचललं याविषयी त्यांनी स्वत:ची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत. आजही आम्ही एका नात्याने बांधले गेलो आहोत. पण नेमकं कारण ठरवा. गोंधळून जाऊ नका. तुम्ही एकदा ठरवा की तुम्ही नेमके का गेले आहात”, असं राऊत म्हणाले.

“..तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”

“जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेले असाल, तर २०१४ साली भाजपाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आमचं हिंदुत्व मजबूत असतानाही ज्या भाजपानं आमची युती तोडली, तेव्हा यातले कुणीच लोक काही बोलले नाहीत. २०१९ साली याच हिंदुत्ववादी भाजपानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? या लोकांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुखांनी घेतली पाहिजे आणि नेमकं कारण कोणतं याविषयी त्यांनी एकमत दिलं पाहिजे. मी स्वत: कधीही सरकारी कामात पडलो नाही. संघटनेच्या कामातच मी आहे. पक्षाची भूमिका मांडतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास तुम्ही फार क्वचित मला पाहिलं असेल. मंत्रालय, इतर सार्वजनिक जागांवर संजय राऊत तुम्हाला कधीच दिसणार नाही”, असं राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

१३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

“माझं आमच्या जुन्या सहकाऱ्यांना आव्हान आहे. गोंधळू नका. तुम्ही का गोंधळला आहात, ते मला माहिती आहे. संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्यासोबत बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असं म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यात. आमचं मन साफ आहे. कुणावरही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे. अर्धे लोक पवारांच्याच पक्षातून आमच्याकडे आलेत”, असं देखील राऊतांनी यावेळी नमूद केलं.

Live Updates