सातारा: महाबळेश्वरमध्ये शुक्रवार, दि. २ ते ४ मे २०२५ या कालावधीत महापर्यटन महोत्सव २०२५ हा जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित केला आहे.या वेली पर्यटनस्थळावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर जारी करण्यात आली आहे.
या महोत्सवास महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक व व्हीव्हीआयपी व व्हीआयपी पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत.
वाई महाबळेश्वर-पाचगणी रस्ता अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महोत्सव कालावधीत वाई बाजूकडून पाचगणी – महाबळेश्वरकडे जाणाऱ्या व महाबळेश्वर पाचगणी बाजू कडून वाई- सातारा बाजूकडे जाणाऱ्या नागरिकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून दि.२ ते ४ मे या कालावधीत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, वाई बाजूकडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पाचगणी व महाबळेश्वरकडे जाईल. महाबळेश्वरवरून मुंबई, पुणे, कुडाळ, पाचवडवरून पुणे- वाई बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही महाबळेश्वर – मेढ़ा- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाईल.
वाहतूक ज्या-ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे, अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. वैशाली कडुकर यांनी केले आहे.
महोत्सव कालावधीत महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गोल्फ ग्राउंड महाबळेश्वर, माखरीया हायस्कुल, माखरीया गार्डन, प्रतापसिंह गार्डन, वेण्णा लेक, क्षेत्र महाबळेश्वर तापोळा, तसेच पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील भोसे, पाचगणी, तळमाळ पाचगणी, थापा दांडेघर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
महाबळेश्वर पाचगणीला जाणारी सर्व वाहतूक ही वाई पसरणी घाट मार्गे जात असते. महाबळेश्वर पाचगणीला दररोज वाईतून भाजीपाला, दूध, अन्नधान्य, भुसारमाल, रोजंदारीसाठी स्थानिकांची येजा सुरू असते. दररोज शेकडो विद्यार्थी शिकण्यासाठी पाचगणीला जातात व तिथून शेकडो लोक शासकीय कामासाठी व महाविद्यालयासाठी,वाईला येजा करतात. महाड पोलादपूर पासून संपूर्ण महाबळेश्वर तालुका रुग्णालयासाठी वाईला येत असतो. या मार्गावरील वाई हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. तेथेही मोठ्या संख्येने पर्यटक भेटत असतात ही तिन्ही शहर एकमेकांवर अवलंबून आहेत. आज पर्यंत कधीही या रस्त्यावर पसरणी घाटात वाहतूक कोंडी झालेली नाही. या मार्गावर अनेकांचे हॉटेल, शेतकरी व्यवसाय आहेत. महाबळेश्वरहून वाई मार्गे पुणे मुंबईला जाता येणार नाही. या निर्णयामुळे वाईकरांचे मोठे नुकसान होणार आहे. हा प्रशासनाचा दुर्दैवी निर्णय आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा.-प्रशांत डोंगरे,सामाजिक कार्यकर्ता.वाई