सावंतवाडी : पुणे-कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील धोकादायक साकव आणि पुलांचा तातडीने आढावा घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८१३ पैकी तब्बल ४०६ साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, यासाठी ३३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तसेच, ३१३ ठिकाणी नवीन साकव बांधणे गरजेचे असून, त्यासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धोकादायक साकवांवरून प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेले चार दिवस जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक साकव वाहून गेल्याच्या किंवा धोकादायक बनल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. खेबुडकर यांनी जिल्ह्यातील साकवांच्या स्थितीची माहिती दिली.

ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८१४ साकव आहेत. यापैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत, तर उर्वरित साकवांचा वापर केला जात नाही कारण त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. नादुरुस्त ४०६ साकवांच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे, तर ३१३ ठिकाणी नवीन साकव बांधण्यासाठी ९७ कोटी रुपये निधीची गरज आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमार्फत तीन साकवांचे बांधकाम सुरू आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २२ साकवांची कामे सुरू असल्याची माहितीही श्री. खेबुडकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाने धोक्याची जाणीव करून देत, पावसाळ्यात अशा धोकादायक साकवांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन धोकादायक साकवांचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.