सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हंगामपूर्व पावसामुळे भात रोपांची लागवड वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती कोरडवाहू शेत जमीन जिल्हा सल्लागार अरुण नातू यांनी दिली. जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्या निर्देशानुसार, सर्व कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे.

अरुण नातू यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकरी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी भात बियाणे पेरून रोपे तयार करतात. मृग नक्षत्रावर पाऊस झाल्यानंतर या रोपांची लागवड केली जाते. यंदाही अशाच प्रकारे रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेरणी करण्यात आली होती. मात्र, रोपे तयार होत असतानाच अचानक आलेल्या हंगामपूर्व पावसामुळे ती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाला फोन करून याबाबत माहिती दिली असून, या तक्रारींच्या आधारे जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, हंगामपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आता मशागत करून शेतीच्या कामांना लागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यंदा जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही अरुण नातू यांनी दिली.

वादळामुळे महावितरणचे ६४.२० लाखांचे नुकसान, वीजपुरवठा पूर्ववत

सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसला होता. या वादळामुळे २१ ते २५ मे दरम्यान मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने युद्धपातळीवर काम करत जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणचे अंदाजित ६४.२० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार, वादळामुळे बाधित झालेली १० उपकेंद्रे, २९ उच्चदाब वाहिन्या, २४१८ रोहित्रे आणि ४३२ गावांमधील वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच, बाधित झालेल्या २२४१३३ ग्राहकांचा वीजपुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. वादळामुळे पडलेले ७२ लघुदाब पोलपैकी ६९ पूर्ववत झाले आहेत, तर २७ उच्चदाब पोलपैकी २४ पोल पूर्ववत करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहक संघटनेकडून नाराजी व्यक्त

एकीकडे महावितरण वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा करत असले, तरी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी वीज वितरण कंपनीने अजूनही वीजपुरवठ्याबाबत ‘लपंडाव’ चालविल्याचा आरोप केला आहे. सावंतवाडीसारख्या शहरात संध्याकाळी चार वेळा वीज खंडित करण्याचा सपाटा लावला गेला आणि संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुल झालेली वीज दहा वाजता सुरू झाली आहे. शहराला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न वीज वितरणने केला, असे लाड यांनी म्हटले आहे.