ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भाजपावर चौफेर टीका केली. दरम्यान, त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली. १९ तारखेच्या सभेतून आपण सगळी उत्तरं देणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. शिमग्याच्या दिवशी त्यांनी बोंब मारली असेल तर आपण समजून घेऊ. पण त्यांना यापेक्षा अधिक महत्त्व देणं गरजेचं नाही, असा टोला अंधारे यांनी लगावला. त्या अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

रामदास कदमांवर टोलेबाजी करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “खेडच्या सभेत संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमगा आहे. त्यामुळे शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक आहे. काल शिमगा होता, त्यामुळे रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील यांनी शिमग्याला बोंब मारली असेल तर ती आपण समजून घेऊ. याच्या पलीकडे त्यांना अधिक महत्त्व द्यावं, असं आम्हाला वाटत नाही.”

हेही वाचा- “लोकशाहीत लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची…”, प्रणिती शिंदेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “योगेश कदमांनी अत्यंत दर्पयुक्त आणि अहंकाराने भरलेली वाक्य वापरली. पण आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने बडबड करत आहेत. त्याही पेक्षा लोकांच्या दरबारात जाऊन लोकांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते काय बोंब मारतात. त्यावर उत्तरं देण्यापेक्षा आम्हाला शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणं जास्त गरजेचं वाटतं. बाकी योगेश कदमांचं काय होणार? रामदास कदमांच्या भांडी घासण्याच्या विधानाचं काय होणार? हे निवडणुका ठरवतील. ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना करणारे लोक आहोत.”

हेही वाचा- बुरा ना मानो होली है! होळीच्या निमित्ताने सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले…

“निश्चितपणे आमचा दर्जा घसरलेला नाही. आमचं मानसिक संतुलनही अजिबातच बिघडलेलं नाही. एवढ्या घडामोडी घडत असाताना आम्ही आमचं मानसिक संतुलन टिकवून आहोत. रामदास कदमांचं एकाच सभेनं इतकं मानसिक संतुलन ढासळेल, ते मानसिकदृष्ट्या इतके कमजोर असतील, असं अजिबात वाटलं नव्हतं,” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी टीकास्र सोडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticise ramdas kadam shimaga bomb uddhav thackerar rally in khed rmm
First published on: 07-03-2023 at 17:50 IST