सांगली : जिल्ह्यात बुधवारी पावसाने पूर्ण विश्रांती घेतली असली तरी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पलूस परिसरात सुमारे अडीच तास पाऊस पडत होता. तर सांगली, मिरज शहरात रात्री दहा वाजेपर्यंत पडत असलेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. मात्र, आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस नेवरी (ता.पलूस) येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नेवरी परिसरात दोन अडीच तासांत तब्बल ६८.५ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय झालेला पाऊस असा मिरज ११.८, जत १९.२, खानापूर १७.५, वाळवा १५.८, तासगाव १०.२, शिराळा ६.८, आटपाडी १७.८, कवठेमहांकाळ ४.८, पलूस ३०.८ आणि कडेगाव २८.४ मिलीमीटर.
तासगाव तालुक्यातील कुमठे-सांबरवाडी, राजापूर-शिरगाव, पेड-नरसेवाडी, विसापूर-आळसंद हे रस्ते गेल्या पाच दिवसांपासून बंद आहेत, तर आटपाडीतील फरशी पुलावरून पाणी वाहत आहे. येरळा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने कडेगाव तालुक्यातील तोंडोली ते सोहोली पूल काटे टाकून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, कृष्णा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आयर्विन पुलाजवळ पाणी साडेपंधरा फूट असून, या ठिकाणी ४५ फूट धोका पातळी आहे. कोयना, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून, कोयना येथे १६ तर चांदोली येथे ९ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत झाला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले.
नुकसानीचे पंचनामे करा – आ. पाटील
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकारी यांना दिल्या.