नांदेड : ‘आंतरराज्य प्रकल्प’ असूनही काँग्रेसच्या दीर्घकालीन राजवटीत रखडलेल्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणावरच्या घळभरणीचे काम अखेर सुरू झाले आहे; पण विस्थापितांकडून अडथळा येऊ नये, यासाठी तेथे मोठा बंदोबस्त ठेवावा लागला.

जिल्ह्याचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी १९८०च्या दशकात वरील प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ४० वर्षे लोटली, तरी या धरणाचे काम अर्धवट राहिले. पण ते आता निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावे यासाठी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मागील काही वर्षांत महायुती सरकारकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे आवश्यक तो निधी प्राप्त झाला. गुरुवारी दुपारी घळभरणीच्या कामांचा शुभारंभ आमदार राठोड यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

वरील प्रकल्पाच्या माध्यमातून मुखेड, देगलूर भागातील २६ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असून, दोन्ही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. लेंडी प्रकल्पग्रस्तांनी ‘आधी पुनवर्सन आणि मग धरण’ अशी भूमिका घेत आंदोलन सुरू ठेवल्यामुळे १३ वर्षांत या प्रकल्पाच्या संदर्भाने निर्माण झालेले काही प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागत गेले. शेतजमिनीचा मावेजा, पुनर्वसन आणि सानुग्रह अनुदान इत्यादी बाबींसाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधल्या काळात प्रकल्पग्रस्तांशी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून संवाद साधला गेला. त्यातून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याची पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर रखडलेल्या घळभरणीच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी करता आला. शासनाकडून आता निधीची अडचण नाही. सर्व संंबंधितांना त्यांच्या हक्काची रक्कम निश्चितपणे मिळेल, अशी ग्वाही आमदार राठोड यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. वरील कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता विवेक तिडके, मुखेडचे माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांच्यासह त्या भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.