राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. तसेच, आता विशेष अधिवेशन बोलावून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचीही मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. एकीकडे ‘सह्याद्री’वर ही बैठक होत असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्र्यांनी बैठकीला ऐरेगैरे नथुलाल लोकांना बोलावल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. “जर महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्र एखाद्या विषयावर पेटवला जात असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा. पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ऐरेगैर नथुलाल बोलवले आहेत. ज्यांचा एकही आमदार नाही. ज्यांच्या पक्षाचं अस्तित्वच नाही. एखादा आमदार आहे. ज्या संघटनेला पाठबळच नाही अशा सगळ्यांना आमंत्रित केलं”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“सहा खासदार आणि १६ आमदार असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं नाही. ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आहे. यातून त्यांचा भित्रेपणा दिसतोय. अंबादास दानवेंना त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून बोलवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपण बोलवलं आहे. जयंत पाटील, राजेश टोपेही तिथे आहेत. बच्चू कडूंपासून महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनाही बोलवलं. सदाभाऊ खोतांचे किती आमदार आहेत?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

“एकनाथ शिंदेंनी बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरेंना बोलावलं, आता…”; शंभुराज देसाईंचं वक्तव्य…

“३१ डिसेंबरला मुख्यमंत्री कायमचे घरी जाणार”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ३१ डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय घ्यावा लागणार आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. “तुम्ही अगदी हेतुपुरस्सर शिवसेनेला वगळता. खरंतर मुख्यमंत्र्यांना ही बैठक बोलवण्याचा अधिकारच नाहीये. ३१ डिसेंबरनंतर ते कायमचे घरी जाणार आहेत. त्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. कारण हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. पण तुम्ही व्यक्तिगत द्वेषातून शिवसेनेला या बैठकीला बोलवलं नाही”, असा आरोप राऊतांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमची काही हरकत नाही. आम्हाला मानपानाची गरज नाही. प्रश्न सोडवा. आम्हाला न बोलवता प्रश्न सुटत असेल, तरी चालेल. मनोज जरांगे पाटलांचे प्राण वाचवा आणि जळणारा महाराष्ट्र विझवा. असं राजकारण करू नका. महाराष्ट्रात इतक्या संकुचिक मनोवृत्तीचं राजकारण झालं नव्हतं. जरांगे पाटलांनी सांगितलंय की राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे. खरंतर एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे”, असंही राऊत म्हणाले.