गेल्या अनेक दिवसांपासून सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल-१२’ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये अमित कुमार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर पहिला इंडियन आयडल अभिजीत सावंतनेही या शोवर नाराजी व्यक्त केली. कधी शोमधील स्पर्धकांचा खोटं प्रेमाचं नाटकं तर कधी जजेस आणि निर्मात्यांच्या वागणुकीमुळे या शोवर टीका केली गेली.

नुकतच या शोचा होस्ट आदित्य नारायणमुळे पुन्हा हा शो चर्चेत आला होता. आदित्यने शोच्या सुत्रसंचालनावेळी अलिबागबद्दल केलेल्या वक्तव्याने त्यावर जोरदार टीका केली गेली. त्यानंतर आता आदित्य नारायणने सोशल मीडियावरून माफी मागितली आहे.

आदित्य नाराय़णने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. यात तो म्हणाला, “मला हात जोडून नम्रपणे अलिबागमधील लोकांची आणि माझ्या इंडियन आयडलमधील वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागायची आहे. कुणालाही दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वत:च्या त्या जागेशी, लोकांशी आणि मातीशी भावना जोडल्या गेल्या आहेत.” असं म्हणत आदित्यने त्याने केलेलल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

 

आदित्यने ‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर अलिबागवरुन टोला लगावला होता. आदित्य नारायणच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला होता. अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला असून यापुढे अलिबागबद्दल असं काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा इशारा दिला होता.