कलाविश्वामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले बिग बी आजकाल सोशल मीडियावरही तितकेच अॅक्टीव्ह असताना दिसतात. अमिताभ अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून त्यांची मते मांडत असतात. शुक्रवारी २६ जुलैरोजी वांगणी जवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने केलेल्या कामगिरीचे कौतूक करणारे ट्विट अमिताभ यांनी केले आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवर एनडीआरएफसाठी ट्विट केले आहे. 'एनडीआरएफचे अभिनंदन. त्यांनी या एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांची सुटका केली. एनडीआरएफ, वायुदल, नौदल, रेल्वे यांनी चांगली कामगिरी केली. ही एक साहसी आणि यशस्वी मोहिम होती' असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले. त्यांचे हे ट्विट पाहता अमिताभ यांना अभिमान वाटत असल्याचे दिसत आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली होती. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊ शकत नव्हती. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले होते ज्यांची सुटका करण्यात आली होती. एनडीआरएफच्या चार तुकड्या, वायुदल आणि नौदल यांच्या मदतीने या सगळ्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. शनिवारी सकाळपासूनच बचाव कार्य सुरु होते. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान होते जे NDRF, वायुदल आणि नौदल यांनी ते पार पाडले.