एक वर्षापूर्वी बरोबर याच महिन्यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुशांतच्या जाण्याने अभिनेत्री अंकिता लोखंडेला मोठा धक्का बसला होता. तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला होता. येत्या १४ जून रोजी त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असतानाच तिच्या मनात या आठवणी पुन्हा घर करू लागल्या आहेत. हा जून महिना सुशांतच्या कुटूंबियांसोबतच अंकिता लोखंडेला देखील कठिण जाणार आहे. यासाठी अंकिता लोखंडेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय.

अंकिता लोखंडेने आज सकाळी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “हे गुडबाय नाही…मी तुम्हा सगळ्यांना काही दिवसानंतर भेटेल.”. सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असतानाच अंकिताने घेतलेल्या या निर्णयावर तिचे फॅन्स काहीसे नाराज झालेत. यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येतंय.

अंकिताने शेअर केलेल्या पोस्टने काही युजर्सना गोंधळात पाडलं आहे, तर काही युजर्सनी तिच्यावर टिका केल्या आहेत. या युजरने लिहिलं, “सुंशातच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण होतंय, सुशांतच्या नावावर खूप प्रसिद्धी मिळवली…म्हणूनच आता ते अंडरग्राऊंड होत आहेत आणि मग काही दिवसांनी तर कमबॅक करतील.” काही युजर्सनी तर अंकिताला ‘हिपोक्रेट’ असं देखील म्हटलंय. काही युजर्स तर तिच्या या पोस्टवर कमेंट करत सोशल मीडियावर ब्रेक घेण्यामागचं कारण विचारताना दिसून येत आहेत. सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असताना ट्रोलिंगपासून बचावासाठी तिने हा ब्रेक घेतला असल्याचं देखील काही युजर्सनी म्हटलंय.

गेल्या वर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने तिच्या अकाउंटवरून कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी हसताना आणि डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केल्यानंतर सुद्धा तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी अंकिताने ट्रोलर्सना जबरदस्त उत्तर सुद्धा दिलं होतं.

आजच्याच दिवशी सुशांतने लिहिली होती शेवटची पोस्ट
अंकिता लोखंडेने आज सकाळी शेअर केलेल्या पोस्टचं वैशिष्ट्य म्हणजे एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३ जून २०२० रोजी सुशांतने त्याची शेवटची पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट त्याने त्याच्या आईसाठी शेअर केली होती. याच दिवशी अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरून घेतलेला ब्रेक यात कोणताच योगायोग दिसून येत नाही.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केलं होतं. तिच्या इन्स्टाग्रामवर लाइव्ह असताना ती सुशांतच्या आठवणीत भावूक झाली होती. यावेळी बोलताना ती म्हणाली होती, “अर्चनाचा मानव फक्त सुशांतच आहे. तो सध्या जिथे कुठे असेल तिथून तो मला पाहत असणार”. काही दिवसांनी सुशांतच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण होत असलं तरी त्याचे फॅन्स आणि कुटूंबिय अजुनही त्याला विसरू शकले नाहीत.