स्वप्निल घंगाळे

चित्रपट म्हटल्यावर त्या चित्रपटाच्या नावाचा समावेश असणारे गाणे त्यात असणे साहजिकच आहे. पण एखाद्या जुन्या गाण्याच्या नावावरूनच चित्रपटाचे नाव ठेवण्याचा ट्रेण्ड सिनेसृष्टीत काही नवा नाही. ‘एक लडकी को देखा तो ऐसे लगा’ या चित्रपटाच्या निमित्ताने याच ट्रेण्डवर टाकलेली नजर..

खरं तर चित्रपटांची नावे ठेवण्यामागे अनेक कारणे असतात. कधी चित्रपटाचा विषय काय आहे? हे नावावरून सांगायचा प्रयत्न असतो, तर कधी नावावरून काहीच कळू नये आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन तो पाहावा हा नावामागील उद्देश असतो. चित्रपट पाहायचा की नाही हे अनेकदा केवळ त्याच्या नावावरून ठरवणारे अनेक जण आहेत. याच कारणामुळे चित्रपटाचे नाव हे आकर्षक आणि तितकेच लक्ष वेधून घेणारे असावे याकडे चित्रपटाच्या निर्मात्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच काही वेळेस आधीच लोकप्रिय असणाऱ्या गाण्यांवरूनच चित्रपटाचे नाव ठेवण्याचाही प्रयत्न निर्माते करतात. त्यामुळे होतं काय आधीच्या गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा चित्रपटाला होतो तसेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. सध्या राजकुमार राव, सोनम कपूर आणि अनिल कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसे लगा’ हा अशाच गाण्यावरून नाव घेतलेला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण असे गाण्यावरून नाव असणारे चित्रपट याआधीही येऊन गेले आहेत. मागील वर्षीच प्रदर्शित झालेला ‘यमला पगला दिवाना-२’ हा चित्रपटही असाच. देओल कुटुंबातील कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर तितकासा चालला नाही, पण धर्मेद्रच्याच ‘प्रतिज्ञा’ चित्रपटामधील मोहम्मद रफींनी गायलेल्या ‘मैं जट यमला पगला दिवाना’ या गाण्यावरून चित्रपटाचे नाव घेण्यात आले होते. याच चित्रपटाचा पहिला भाग २०११ साली प्रदर्शित झाला होता.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या शाहरुख खान आणि काजोलच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटाचे नावही गाण्यावरून घेण्यात आले आहे. ‘चोर मचाऐ शोर’ या १९७४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये मुमताज आणि शशी कपूर यांच्यावर ‘दिलवाले दुल्हनीया ले जाऐंगे’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते. आणखीन एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटामध्ये धर्मेद्र आणि हेमामालिनीवर चित्रित करण्यात आलेल्या ‘जब तक हैं जान, मै नाचूंगी’ याच गाण्यातील शब्दांचा वापर करुन ‘जब तक हैं जान’ हा शाहरुख, कतरिना आणि अनुष्का यांचा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. ‘पाकिझा’ या जुन्या चित्रपटातील ‘चलते चलते’ या गाण्यावरून शाहरुख आणि राणीची प्रमुख भूमिका असणारा ‘चलते चलते’ हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कोई मिल गया’ चित्रपटाचे नावही शाहरुख, राणी, काजोल यांच्या ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटामधील ‘कोई मिल गया मेरा दिल गया’ या लोकप्रिय गाण्यामधूनच घेण्यात आले होते. परग्रहावरील जादूशी होणारी भेट या पार्श्वभूमीवर चित्रपटात असल्याने हे नाव चित्रपटाच्या कथानकाला शोभणारे होते. ‘हम किसी से कम नही’ या १९७७ साली आलेल्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांनी ‘बच ना ऐ हसिनो’ म्हणत प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावले होते. बरोबर ३१ वर्षांनंतर याच गाण्याच्या नावावरून आलेल्या चित्रपटामध्ये ऋषी यांचा मुलगा रणबीर कपूरने प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली. तरुणाईला फ्रेंण्डशीप गोल्स आणि ट्रॅव्हल गोल्स देणारा प्रचंड गाजलेला आणि आजही लोकप्रिय असलेला रणबीरचा आणखीन एक चित्रपट म्हणजे ‘ये जवानी हैं दिवानी’. या चित्रपटाचे नावही ‘ये जवानी, हैं दिवानी, हाक मेरी राणी’ या १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जवानी दिवानी’ चित्रपटातील गाण्यावरून घेण्यात आले. विशेष म्हणजे किशोरकुमार यांच्या आवाजातील हे मूळ गाणे रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

संगीत दिग्दर्शक आणि संगितकार ए. आर. रेहमान याला ज्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील संगीतासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला त्या चित्रपटातील ‘जय हो’ गाण्यावरून सलमान खान आणि तब्बूची प्रमूख भूमिका असणारा ‘जय हो’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला. ‘इश्किया’ चित्रपटातील ‘दिल तो बच्चा हैं जी’ गाण्याच्या नावानेच नाव असणाऱ्या २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि ओम, विद्या यांची धम्माल विनोदी गोष्ट पाहायला मिळाली. ‘गजनी’ या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटातील ‘है गुजारीश’ गाण्यावरून हृतिक रोशनमधील अभिनेत्याची दमदार अदाकारी दाखवणारा ‘गुजारीश’ हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला. हृतिकचा पदार्पणाचा चित्रपट असणाऱ्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील ‘ना तुम जानो ना हम’ या गाण्यातील शब्दांवरून नाव असलेला चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट ‘कहो ना प्यार है’ इतका लोकप्रिय ठरला नाही. हृतिक, फरहान अख्तर आणि अभय देओलचा तरुणाईला ट्रॅव्हल गोल्स देणारा चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाचे नाव फरहान अख्तरच्याच ‘रॉक ऑन’ चित्रपटामधील गाण्यावरून घेण्यात आले होते. गंमत म्हणजे झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील ‘दिल धडक ने दो’ गाण्यावरूनच नाव असलेला अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे नावही गाण्यावरून ठेवण्यात आले होते.

आणखी काही..

‘ओम शांती ओम’, ‘बार बार देखो’, ‘जाने तू या जाने ना’, ‘कभी अलविदा ना कह ना’, ‘माय नेम इज अँथनी गोंसाल्वीस’, ‘बच के रहना रे बाबा’, ‘खोया खोया चांद’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘दिलविल प्यार व्यार’, ‘दम मारो दम’, ‘रमया वस्तावय्या’, ‘आ देखे जरा’, ‘लेकर हम दिवाना दिल’, ‘लागा चुनरी मे दाग’, ‘कौन हैं जो सपनो में आया’ अशा अनेक चित्रपटांची नावे ही गाण्यांवरूनच घेण्यात आली आहेत. गाणं, गाण्यावरून नाव ठेवण्यात आलेले चित्रपट आणि गाजलेले चित्रपट असं समीकरण बॉलीवूडमध्ये प्रभावी ठरतंय. यावरून बॉलीवूडची गाण्यांसाठी असणारी वेगळी ओळख यानिमित्ताने अधोरेखित होतेय.