बॉलिवुडमधली सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण होय. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्ययाची जादू कोट्यवधी प्रेक्षकांना घाळाय करते. ‘बाजीराव- मस्तानी’, ‘पिकू’, ‘पद्मावत’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘राम लीला’ यांसारख्या चित्रपटातील दमदार अभिनय कौशल्यानं तिनं सर्वांचचं लक्ष वेधलं. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिनं पदार्पण केलं. या चित्रपटाला आता ११ वर्षे होतील.
करिअर घडवण्यासाठी दीपिका सर्वप्रथम मुंबईत आली होती. विषेश म्हणजे मुंबईत येण्यासाठी तिला प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकरनं खूपच मदत केली. तिनं एका मुलाखतीत अतुलचा उल्लेख करत त्याचे आभार मानले. ‘मी मुंबईत येण्याचा विचार पक्का केला. मी कधीही माझं घर सोडून बाहेर गेले नव्हते. माझ्या पालकांना माझी खूपच चिंता वाटत होती पण त्यावेळी अतुल कसबेकर ही पहिली व्यक्ती होती जी माझ्या पालकांशी बोलली. त्यानं माझ्या पालकांना विश्वास दिला.’ असं म्हणत दीपकानं त्याचे आभार मानले.

‘दीपिकानं वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईत जाण्याचं ठरवलं. मुंबईत राहण्यासाठी तिला जागाही नव्हती त्यामुळे आम्हाला तिची काळजी वाटायची. आमच्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय पचवणं तेव्हा खूप अवघड झालं होतं पण तिनं आपला निर्णय हा योग्यच होता हे सिद्ध करून दाखवलं’, असं म्हणत काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं.
आज दीपिका ही बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. मानधनाच्या बाबतीत तिनं ग्लोबल स्टार ठरलेल्या प्रियांका आणि ऐश्वर्यालाही मागे टाकलं आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ती अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 12:59 pm