छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याच काम ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मलिका यशस्वीरित्या करत आहे. आतापर्यत या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा उलगडा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता संभाजी महाराजांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वपूर्ण प्रसंग या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. दिलेरखानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. त्यामुळे ही भेट लवकरच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील ही ऐतिहासिक भेटी मंगळवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २७ ऑक्टोबर या भागामध्ये पाहता येणार आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये शंतनू मोघेने शिवाजी महाराजांच्या भुमिका वठविली असून डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांनी आपापल्या परिने भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.