डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रोतोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांची आज देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. तो व्हिडीओ पाहून अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू यांचे पूर्ण आयुष्य बदलले. मात्र या गाण्यानंतर रानू काय करत आहेत असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

हिमेश रेशमीयाच्या चित्रपटातील गाणी गायल्यानंतर रानू सोशल मीडियावर कुठेच दिसत नाहीत. त्या सध्या काय करत आहेत? कुठे आहेत? कोणासोबत काम करणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या रानू मंडल त्यांच्या आगामी प्रोजक्टमध्ये व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी त्यांचे फेसबुक पेज तयार केले असून त्या त्यांच्या कामाबाबतचे अपडेट त्या पेजवर शेअर करताना दिसतात.

इतकच नव्हे तर रानू मंडल यांच्या फेसबुक पेजला २ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. रानू मंडल यांच्या यशात महत्त्वाचा वाटा असणारा एतींद्र चक्रवर्ती त्यांचे फेसबुक पेज हॅन्डल करत असतो. तसेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रानू यांच्या कामाचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो.

आणखी वाचा : दुर्गा पूजेसाठी रानू मंडल यांचे खास गाणे

रानू मंडल यांचा रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलनेने रानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.