कपूर खानदानातील रणबीर आणि करिना या भावा-बहिणीच्या नात्याची बऱ्याचदा चर्चा ऐकायला मिळते. दोघेही एकमेकाच्या अगदीच जवळ असतात हे वेगळे सांगायला नको. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी अनेक फोटो शेअर करुन नात्यातील प्रेम वेळोवेळी दाखवून दिले आहे. रणबीर कपूर फक्त बहिण करिना कपूरसोबतच अधिक संपर्कात असतो असे नाही. तर त्याचे करिनाचा पती सैफ अली खानसोबतचे हितसंबंध देखील चांगले आहेत. नुकतेच या दोघांनी बराचवेळ ऐकमेकांसोबत घालविल्याचे समजते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांनी सैफच्या वांद्रा येथील निवासस्थानी ऐकमेकांच्या आयुष्यावर मनमोकळ्या गप्पा केल्या. जीजा-साला यांच्यामध्ये रंगलेल्या गप्पांमध्ये ‘लाईफ, लेडिज अॅण्ड मुव्हीज…’ या विषयांना महत्त्वाचे स्थान होते.

बॉलिवूडमधील दोन आघाडीचे कलाकार बंगल्यामध्ये गप्पा गोष्टी करत असताना बेबो करिना चिमुकल्या तैमुरसोबत गप्पा गोष्टी करण्यात व्यग्र होती. काही दिवसापूर्वी बॉलिवूड निर्माता करण जोहर याच्यासोबत कॉफी घेताना ग्लॅमरस मम्मी करिना कपूरने धम्माल मस्ती केल्याचे दिसले होते.  यावेळी करणने दीपिका आणि कतरिना यांच्याबद्दल करिनाला प्रश्न विचारला होता. दीपिका आणि कतरिनासोबत तू जर एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर तू काय करशील? असे विचारत करणने रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसींबद्दल करिनाची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. भावाच्या पूर्व प्रेमसंबंधावर करिनाने हैराण करणारे उत्तर दिले होते. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत जर लिफ्टमध्ये अडकले तर मला आत्महत्या करावी लागेल, असे करिना म्हणाली होती.

रणबीरच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. संजय दत्तच्या भूमिकेसाठी सध्या रणबीर चांगलीच मेहनत घेताना दिसते. लवकरच तो या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

दुसरीकडे नवाब सैफ अली खान दीपिका पदुकोण सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात सैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान राजस्थानची राणी पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारताना दिसेल. पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चुकीचा इतिहास रंगविल्याप्रकरणी चांगलेच वादंग उठल्याचे पाहायला मिळाले होते.