ज्यात आपला जीव गुंतावा आणि तोच जीव कुणीतरी घेऊन पळून जावं. लहानग्यांच्या अपहरणाच्या घटना कित्येक घरांमध्ये कळीकाळाच्या जखमा ठेवून जातात. काळाचं औषध लागू पडलं तर अशा घटना विसरल्याही जातात. पण असं काय झालं असेल? कोणी पळवलं असेल आणि का?, या प्रश्नांची उत्तरं जर झोपू देत नसतील तर.. अपहरणाच्या घटनेनंतर मागे राहिलेल्यांच्या मनात जे भावनाटय़ सुरू होतं ते कित्येकदा कोणाच्या गावीही नसतं. रिभु दासगुप्ता दिग्दर्शित ‘टीई३एन’ या विचित्र नावाच्या चित्रपटात अपहरणकर्त्यांच्या शोधाबरोबरच समांतर अशा एका भावनाटय़ाचा उलगडा होत जातो तो पाहणाऱ्याला जखमेसारखा आत ठसठसत राहतो.
teen01‘टीई३एन’ हे विचित्रपणे लिहिलेल्या नावाचा सरळसाधा अर्थ म्हणजे अवघ्या तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या पटावरून घेतलेला एकाच अपहरणाच्या घटनेचा शोध असं फारतर म्हणता येईल. सुजॉय घोषची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आपल्याला जॉन बिस्वास नामक एका वयस्कर वृद्धाच्या रूपात भेटतात. व्हीलचेअरवर असलेली पत्नी, तिची आणि घराची काळजी घेणारा जॉन आपल्या एकाकी घराला एकेकाळी गजबजवून टाकणाऱ्या नातीच्या एंजेलाच्याच आठवणीत रमला आहे. आठ वर्षांपूर्वी एंजेलाचे अपहरण झाले होते मात्र अजूनही अपहरणकर्ता जॉनला सापडलेला नाही. आठ वर्ष दररोज न चुकता पोलीस ठाण्यात येऊन एकच प्रश्न विचारणाऱ्या जॉनचे अप्रूप पोलीस अधिकारी असलेल्या सरिता सरकारलाही (विद्या बालन) आहे. सरिता मदत करू शकत नाही आणि जो मदत क रू शकतो तो पोलीस अधिकारी मार्टिन (नवाजुद्दिन सिद्दिकी) तोही फादर बनून चर्चमध्ये लोकांना धर्माचे धडे देतो आहे. अशा परिस्थितीत जॉन स्वत:च आपले शोधकार्य सुरू करतो. जॉनचा शोध आणि त्याचवेळी पुन्हा घडलेली तशीच अपहरणाची घटना यामुळे हे तिघेही वेगवेगळ्या पातळीवर एकाच घटनेशी जोडले जातात.
या चित्रपटाची कथा ‘माँटेज’ या कोरिअन चित्रपटाच्या कथेवरून बेतलेली आहे. मात्र इथे या चित्रपटाची कथा पूर्णपणे कोलकात्यात घडते, पहिल्या फ्रेमपासून त्याची जी मांडणी आहे ती पाहता साहजिकच आपल्याला हटकून सुजॉयच्या ‘कहानी’ चित्रपटाची आठवण येते. पण ‘कहानी’मध्ये ज्या वेगाने कथा पुढे सरकत राहते तो वेग, ती प्रभावी मांडणी ‘टीई३एन’ या चित्रपटाला नाही. हा चित्रपट काही मर्यादेपर्यंत अपहरणकर्त्यांचा सरधोपट पद्धतीने घेतलेला शोध इथपर्यंतच मर्यादित राहतो. मात्र काही कळायच्या आत एका क्षणाला चित्रपटाची कथा विलक्षण वळण घेते.
जॉन, सरिता आणि मार्टिन एकत्र असूनही त्याचा वेगवेगळया पद्धतीने आणि आपापल्या तर्काप्रमाणे शोध घेतात तेव्हा त्यांनी आता या क्षणाला एक त्र असायला हवं ही भावना आपल्याला अस्वस्थ करत राहते, पण तरीही ते एकत्र येत नाहीत. जॉन आणि मार्टिन परिस्थितीने या घटनेशी एकत्र जोडले गेले आहेत. जॉन अजूनही त्याच परिस्थितीत राहून सत्यासाठी झगडतो आहे तर मार्टिन मात्र त्या घटनेनंतर चर्चची वाट पकडून त्या वास्तवापासून दूर पळतो आहे. अपरहणाच्या घटनेनंतर या दोघांच्या मनात रंगलेलं भावनाटय़, त्यांचं अडकलेलं आयुष्य असा वेगळाच पैलू दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे केवळ रहस्यपट ठरत नाही मात्र त्याची मांडणी खूप संथ पद्धतीने होते. मध्यंतरानंतर चित्रपट खऱ्या अर्थाने पकड घेतो. अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि विद्या बालन असे तीन जबरदस्त कलाकार समोर असल्याने चित्रपटाचा प्रभाव पडतोच. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. अपहरणकर्त्यांला तुरुंगापर्यंत पोहोचवणं एवढाच जॉनचा ध्यास असतो का? एंजेलाचे दुर्दैवी मरण मार्टिनला पोलीस खात्यापासून दूर का नेते? आणि याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे चित्रपटात पूर्ण वेळ वावरलेल्या विद्या बालनला श्रेयनामावलीत ‘पाहुणी’ का म्हटलं आहे?, असे प्रश्न आपल्याला छळत असले. तरी हा चित्रपट अपहरणाच्या घटनांपलीकडे जात काही एक अस्वस्थता, काही एक विचार मनात सोडून जातो हेही नक्की!

टीई३एन
दिग्दर्शक – रिभु दासगुप्ता
कलाकार – अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी, विद्या बालन, सब्यसाची चक्रवर्ती, पद्मावती राव
संगीत – क्लिंटन सेरेजो
रेश्मा राईकवार