बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली १२ तारखेला लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झाले. ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आज इटलीतील एका आलिशान व्हिलामध्ये हे दोघं विवाहबद्ध होणार आहेत. इटलीतील टस्कनी या निसर्गरम्य परिसरात लग्न करणार आहेत. लग्नाला जवळच्याच मित्र- परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे. यात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या नावाचा समावेश आहे.

पाहुण्यांच्या यादीत दोन सुपरस्टार्सना आमंत्रित केले गेले असले तरी सलमानचे नाव मात्र यातून वगळण्यात आले आहे. शाहरुख आणि आमिर अनुष्काचे जेवढे जवळचे मित्र आहेत तेवढा सलमान नसावा असे म्हटले जाते. त्यामुळेच तिने सलमानला तिच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही.
‘झूम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुलतान सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवसआधी अनुष्काने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, ‘सलमानची वागणूक घाबरवणारी आहे. सलमान फक्त त्याच्याशीच निगडीत कामं त्याच्या पद्धतीने करतो. मी फार लाजाळू आहे. आमच्या दोघांमधील दरी मी भरू शकले नाही.’ त्यामुळे सलमान आणि तिचे संबंध फक्त व्यावसायिक पातळीपुरतेच मर्यादीत राहिले.

विराट आणि अनुष्का त्यांच्या परिवारासोबत इटलीला रवाना झाले. त्यांच्यासोबत पंडितही गेले. हे तेच पंडित आहे ज्यांना भेटण्यासाठी अनुष्का आणि विराट डेहराडूनला गेले होते. ‘मेनएक्स’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, या लग्नाला जास्त लोकांना ते आमंत्रित करु शकले नाही. विराटचे फार जवळचे मित्र आणि कुटुंबीय लग्नाला उपस्थित राहणार आहेत. लग्नानंतर मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये रिसेप्शन देण्यात येणार आहे.