“भारत हा असा देश आहे जिथे गायी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. तुम्ही हिंसेचा वापर करुन लोकांना दडपून ठेऊ शकत नाही,” असा इशाराच अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिने सरकारी यंत्रणांना दिला आहे. मात्र नेटकऱ्यांनी यावरुन ट्विंकलला तिचा पती म्हणजेच अक्षय कुमार हाच भाजपाचा समर्थक असल्याचा टोला लगावला आहे. काहींनी तर अक्षयने हातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) झेंडा पकडल्याचा फोटो ट्विंकलला टॅग करुन ट्विट केला आहे. अभाविपनेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.

काय घडलं?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष यांच्याबरोबर २० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

ट्विंकलने व्यक्त केला संताप

याच प्रकरणावरुन ट्विंकल खन्नाने एका वृत्तपत्राचा फोटो ट्विट करत निषेध व्यक्त करण्याबरोबरच सरकारी यंत्रणांना इशाराही दिला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वृत्तपत्र दिसत आहे. या वृत्तपत्रामध्ये जेएनयूमधील हल्ल्याची बातमी आहे. यात लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोर दिसत असून बातमीचा मथळा, “ते इथेच आहेत काल एएमयू, आज जेएनयू आणि उद्या यू (तुम्ही)” असा आहे. याच पहिल्या पानाचा फोटो शेअर करत ट्विंकलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारत हा असा देश आहे जिथे गायी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. मात्र आता हा देश झुकण्यासाठी तयार नाही. तुम्ही हिंसेचा वापर करुन लोकांना दडपून ठेऊ शकत नाही. असं केल्यास अनेक आंदोलनं, बंद होतील आणि अधिक लोकं रस्त्यावर उतरतील. हेच या मथळ्यामधून दिसत आहे,” असं ट्विंकलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विंकललाच सुनावले

काही तासांमध्ये सात हजारहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. काहींनी ट्विंकलने उघडपणे अशाप्रकारे या हल्ल्याचा निषेध नोंदवल्याबद्दल तिचे कौतुक केलं आहे. मात्र अनेकांनी यावरुन ट्विंकललाच सुनावले आहे. हा हल्ला घडवून आणल्याचा ज्या अभाविपवर आरोप केला जातोय त्या अभाविपचा प्रचार तुझाच नवरा करत असल्याचं सांगितलं आहे.

घरी चर्चा करा

‘या प्रश्नावर आधी तुम्ही घरी चर्चा करा,’ असा सल्लाही अनेकांनी ट्विंकलला दिला आहे.

ट्विंकलला अशाप्रकारे ट्रोल केले जात असले तरी अनेकदा तिने अक्षय कुमारच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका उघडपणे मांडल्याची उदाहरणे आहेत. अक्षयने मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती त्यावेळीही मोदींनी ट्विंकल यांच्या या टीकात्मक शैलीवर मजेशीर टीप्पणी केली होती.