बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक ते तितक्याच आवडीने आजही पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ९ वर्षे उलटली असली तरी चाहते तितक्याच आनंदाने आजही पाहतात. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील हृतिक, अभय आणि फरहान या तिघांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण निर्मात्यांनी सुरुवातीला हृतिक आणि अभय ऐवजी दुसऱ्या कलाकारांची निवड केली होती.

सुरुवातीला चित्रपट निर्मात्यांनी हृतिक आणि अभय ऐवजी इमरान खान आणि रणबीर कपूरची निवड केली होती. त्यावेळी इमरान आणि रणबीर हे दोघे अतिशय लोकप्रिय कलाकार होते. पण काही कारणास्तव त्यांनी चित्रपटाला नकार दिला होता. फरहान अख्तरची निवड निर्मात्यांनी सुरुवातीपासूनच केली होती. त्याने या चित्रपटातील डायलॉग लिहिले होते. त्यामुळे फरहानची निवड करण्यात आली होती.

तसेच चित्रपटातील कतरिनाच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. अखेर निर्मात्यांनी कतरिनाची त्या भूमिकेसाठी निवड केली. तसेच अभय देओलने ‘हनीमून ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड’ या चित्रपटात जोया अख्तरसोबत काम केले होते. त्यामुळे त्याची निवड झाली असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : ‘जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या वेळी फक्त हृतिकला…’, अभय देओलने व्यक्त केला राग

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे जोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.