भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अभिनेता रितेश देशमुख, कार्तिक आर्यन यांसह अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे.

एकीकडे बॉलिवूडच्या लोकांनी भारतीय संघाचे कौतुक केले तर दुसरीकडे टीव्ही विश्वातील प्रसिद्ध नाव आणि तारक मेहता मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी चांगलेच ट्रोल झाले आहेत. काल रात्री सामना संपल्यानंतर असितकुमार मोदी यांनी रात्री १२ वाजता एक ट्विट केले की, ‘बहुतांश पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या राष्ट्रीय भाषेत हिंदी किंवा उर्दू यामध्ये बोलतात आणि आमचे क्रिकेटर इंग्रजीत बोलतात, तुमचे मत काय आहे? भारताच्या विजयावर असित मोदींनी असा प्रश विचारल्याने त्यांना ट्रोल करण्यात आले.

शैलेश लोढांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार तारक मेहतांची भूमिका?

असित मोदींना रिप्लाय देताना एका यूजरने लिहिले, त्यांना हे माहित नाही. दुसर्‍याने लिहिले, ‘तारक मेहता का उल्टा चष्माच्या पुढील भागात हा मुद्दा ठेवा आणि बबल गमसारखा चघळत बसा’. एकाने लिहले की ‘त्यांना इंग्रजी येत नसल्याने ते इंग्रजीत बोलत नाहीत’. निर्मात्याला ट्रोल करत युजरने लिहिले, ‘आधी तुमचा शो हाताळा आणि मग इतरांशी बोला. तर आणखीन एक यूजरने दया भाभीचा विषय मध्येच आणत, ‘दया भाभी हे पात्र कधी दिसणार’? असा प्रश्न थेट निर्मात्यांना विचारला.

नुकतेच मालिकेतील महत्त्वाचे पात्र (तारक मेहता) साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडली. असित मोदी यांनी शैलेश लोढा यांना मालिका सोडू नये, म्हणून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आलं नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका गेली १४ वर्षे सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. काही कलाकारांच्या जागी नवीन कलाकार आले तरी मालिका अजूनही चालू आहे.