अभिनेता आमिर खान बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये द परफेक्शनिस्ट म्हणूनही संबोधलं जातं. अशातच नुकतंच त्याने राज शामानीला मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने त्याच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी माझ्या स्वभावावर काम करत आहे. पण, पूर्वी माझं जर कोणाहीबरोबर भांडण झालं असेल तर मी त्या व्यक्तीला स्वत:पासून लांब करायचो, त्याच्याशी संवाद साधायचो नाही. “
राज शामानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खान पुढे त्याच्याबद्दलच्या नावडत्या गोष्टींबद्दल बोलताना म्हणाला, “जे मला दुखवायचे त्यांना माफ करणं मला कठीण जायचं.” यावेळी आमिरला दिग्दर्शिका किरण रावबरोबरच्या घटस्फोटामागच्या कारणाबद्दल विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, “मी खूप भावूक माणूस आहे, जर मला कोणी त्रास दिला असेल, दुखावलं असेल तर मी त्या व्यक्तीच्या संपर्कात रहात नसे. स्वत:ला त्यांच्यापासून लांब ठेवायचो. पण, आता मी असं करत नाही. पूर्वी एकदा माझं किरणबरोबर भांडण झालं होतं. जशी एरवी नवरा-बायकोमधील भांडणं असतात तसंच आणि त्यावेळी तिने जे वक्तव्य केलं होतं, त्यामुळे मी खूप दुखावलो गेलो होतो.”
आमिर खान पुढे म्हणाला, “तिने मला दुखावलं म्हणून तिला धडा शिकवण्याकरता मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. चार दिवस मी तिच्याशी बोललोच नाही. आम्ही एकाच घरात राहायचो, एकाच पलंगावर झोपायचो, पण तरीसुद्धा मी तिच्याशी काही बोलत नसे व तिने काही विचारल्यावर तिला प्रतिक्रिया देत नसे. चौथ्या दिवशी रात्री ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला कुठलीच प्रतिक्रिया देत नव्हतो. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, मला कळत नाहीये मी काय करू. तू माझ्याशी बोलतही नाही आहेस. तेव्हा माझ्या डोक्यात अनेक विचार सुरू होते. एकीकडे तिच्या बोलण्याने मी दुखावलो होतो म्हणून माझा तिच्यावरचा राग कायम होता. पण, दुसरीकडे माझ्यामुळे तिला त्रास होत आहे हे बघून मी स्वत:ला दोष देत होतो; त्यामुळे ही माझ्यातील मला अजिबात न आवडणारी गोष्ट आहे.”
आमिर खान व किरण राव यांनी २००५ साली लग्न केलं होतं, तर त्यांना आझाद नावाचा एक मुलगाही आहे. परंतु, या जोडप्याने २०२१ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर यांच्यातील मैत्री कायम आहे. आमिर खान म्हणाला, “किरण राव व रीना दत्ता यांच्यासह माझे आजही चांगले संबंध आहेत, तर त्या मला कुटुंबीयांप्रमाणे आहेत.