Amir Khan Talks about Thugs of Hindostan : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज २० जून रोजी त्याचा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याने प्रमोशनदरम्यान काही मुलाखती दिल्या. अशातच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याला इच्छा नसतानाही एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करावं लागलं होतं याबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ हे कलाकारही झळकले होते.

‘यशराज फिल्म’सची निर्मिती असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख हे कलाकार झळकले होते. २०१८ साली दिवाळीच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार हा त्या वर्षातील बहुचर्चित चित्रपट होता. ५०.७४ कोटी या चित्रपटाची सुरुवातीच्या दिवसांतील कमाई होती; पण नंतर मात्र या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

आमिर खानने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात कलाकारांची तगडी फौज असूनही चित्रपट काही फारसा चालला नाही. चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आमिर खानला स्वत: या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी घ्यावी लागली होती. ‘झी म्युझिक कंपनी’सह संवाद साधताना तो म्हणाला, “‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट मला आवडला नव्हता. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली आहेत आणि मी आदित्य चोप्राचा खूप आदर करतो; पण काही कारणांमुळे आमच्यात मतभेद होते. जेव्हा चित्रपट तयार झाला होता तेव्हा आदित्य व आमच्या दिग्दर्शकांना तो खूप आवडला होता; पण मला तो जराही आवडला नव्हता”.

आमिर म्हणाला, प्रेक्षकांनाही चित्रपट आवडणार नाही याची त्याला पूर्वकल्पना होती. याकरिता त्याने चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा व दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांना समजावण्याचा प्रयत्नही केला होता. अभिनेता पुढे म्हणाला, “संहिता लिहितानाच मला चित्रपट आवडला नव्हता. मी त्याला आठ महिने समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना विश्वास होता की, चित्रपट खूप छान बनेल. मग शेवटी निर्माता आणि दिग्दर्शक यांनी जो निर्णय घेतला, तोच मी मान्य केला. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काम केलं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खान पुढे म्हणाला, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आठवडाभरापूर्वी तो लहान मुलासारखा झोपला होता. जे त्याच्या इतर चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी तो कधीच करत नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली की, त्याची झोप उडते. आमिर याबाबत म्हणाला, “त्यावेळी मला किरण विचारत होती की, तुला झोप कशी येत आहे तेव्हा मी म्हटलं की, मला चित्रपटाची जराही काळजी नाहीये. कारण- मला माहीत आहे की, हा चित्रपट चालणारच नाही. मलाच तो आवडला नाही. त्यामुळे मी प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षा का करू”.