‘बादशाह’ व ‘सिर्फ तुम’ या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दीपशिखा नागपालने तिच्या दोन घटस्फोटांबद्दल सांगितलं. तिचं पहिलं लग्न जीत उपेंद्रशी झालं होतं, २००७ साली तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २०१२ मध्ये केशव अरोराशी लग्न केलं आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दीपशिखाने तिच्या करिअरमध्ये काही बी-ग्रेड चित्रपट केले होते, त्याबद्दलही तिचं मत व्यक्त केलं.
इंन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा लग्न करण्याबद्दल दीपशिखाचं मत विचारण्यात आलं. पुन्हा लग्न करण्यात काहीच चुकीचं वाटत नाही, कारण आधीच दोन घटस्फोटांचा अनुभव आहे, असं दीपशिखा म्हणाली.
मी ३-४ वेळा लग्न करू शकते – दीपशिखा नागपाल
४७ वर्षांची दीपशिखा म्हणाली, “मी ३-४ वेळा लग्न करू शकते. मला यात काहीच लाज वाटत नाही. किमान मी माझे आयुष्य जगत आहे. जेव्हा मी अशा दोन लोकांना एकत्र पाहते, ज्यांचं पटत नाही तेव्हा मला वाईट वाटतं. कदाचित मी माझ्या आधीच्या जोडीदारांसाठी योग्य नव्हते.”
प्रेमावर अजूनही विश्वास
“मी नेहमीच चुकीच्या कारणांसाठी लग्न केले. तुम्ही नेहमीच योग्य कारणांसाठी लग्न केलं पाहिजे, म्हणून मी प्रत्येक गोष्टीसाठी त्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही. मला वाटते की मी खूप रोमँटिक आहे,, माझा प्रेमावर विश्वास आहे, माझा लग्नावर विश्वास आहे. लग्नात दोघेही खूश नसतील तर आयुष्य उध्वस्त करण्यापेक्षा वेगळं होऊन जगणं चांगलं,” असं दीपशिखा म्हणाली.
चुकीच्या नात्यात असणं हे आव्हान
“प्रत्येकाला आपलं आयुष्य जगायचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही एका चुकीची शिक्षा आयुष्यभर भोगू शकत नाही. त्यामुळे त्रासात जगू नका. लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात, चुकीच्या नात्यातून बाहेर येणं सोपं नाही. पण चुकीच्या किंवा वाईट नात्यात असणं हे एक आव्हान आहे,” असं दीपशिखा म्हणाली.
पहिल्या घटस्फोटानंतर दुसरं लग्न करूनही आयुष्यात गोष्टी ठिक झाल्या नाही, त्याबद्दल दीपशिखाने खंत व्यक्त केली. नात्यात येण्यासाठी वेळ घेते, पण तरीही त्या नात्यातून बाहेर पडताना त्रास होतो, असं दीपशिखा स्वतःबद्दल म्हणाली. “मला ५-६ वर्षे लागतात. मला अपराधी असल्यासारखं वाटायचं. पण नंतर मी हा पॅटर्न तोडायचं ठरवलं. त्यासाठी मी कलेचा आधार घेतला,” असं दीपशिखाने नमूद केलं.
बी-ग्रेड चित्रपट केल्याची खंत
दीपशिखाला करिअरच्या सुरुवातीला बी-ग्रेड चित्रपट केल्याची खंत वाटते. त्या चित्रपटांची नावं घेऊन कोणाला दुखवायचं नाही, पण त्यावेळी चित्रपट निवडण्याची समज नव्हती. सल्ला द्यायला कोणी गॉडफादर नव्हता. पण नंतर मी स्टँडर्ड वाढवले आणि त्या चुका परत करायच्या नाही असं ठरवलं. स्वतःवर काम केलं, त्यामुळे आता सात वर्षांपासून एकटी असले तरी सोबत कोणी नाही असं वाटत नाही, असं दीपशिखाने म्हटलं.