‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे कलाकार व दिग्दर्शक यांच्यावर जेवढी टीका झाली तेवढीच किंबहुना त्याहून कित्येक पटीने जास्त टीका याचे लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर झाली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा मिळाल्या. त्यानंतर मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. आता याच वादामुळे मनोज मुंतशीर पुन्हा चर्चेत आले आहेत.

नुकतंच मनोज यांनी ‘दी लल्लनटॉप’चा खास प्रोग्राम ‘बैठकी’मध्ये हजेरी लावली. ‘आदिपुरुष’वरुन झालेला वाद, कविता चोरीचा आरोप तसेच राहुल गांधी यांना विदेशी आईच्या पोटी जन्मलेला पुत्र म्हणून हिणवलं जाणं अशा वेगवेगळ्या विषयांवर मनोज यांनी या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. नेमकं मनोज काय बोलले आहेत तेच आपण विस्तृतपणे जाणून घेऊयात.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली चूक मान्य करत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले, “दुसरी संधी…”

मनोज मुंतशीर यांनी डिसेंबर २०२२ मध्ये भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधींवर भाष्य केले होते. यासाठी त्यांनी चाणक्य यांचा संदर्भ दिला होता. मनोज म्हणाले होते, “विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही, ही डीएनएची खूप मोठी समस्या आहे.” मनोज यांना त्यावेळी भारत आणि चीनमधील लष्करी चकमकीचा संदर्भ द्यायचा होता. यावर छत्तीसगड काँग्रेसने मनोज यांचे वक्तव्य आक्षेपहार्य असल्याचा दावाही करण्यात आला होता.

त्यावेळी कोणाचेही नाव न घेता केवळ चाणक्यचा संदर्भ देत मनोज यांनी हे वक्तव्य केलं होतं. आता याबद्दल त्यांनी या मुलाखतीमध्ये प्रथमच भाष्य केलं आहे. मनोज म्हणाले, “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, त्यावेळी भोपाळमध्ये माझा एक प्रोग्राम होता आणि आपल्या देशातील एका बड्या राजकीय नेत्याला मी टेलिव्हिजनवर भारतीय सैनिकांबद्दल अपमानकारक भाषेत टिप्पणी करताना ऐकलं होतं. आपले सैनिक चीनच्या सैनिकांकडून मार खात होते असं काहीसं त्या राजकीय नेत्याने वक्तव्य केल्याचं टेलिव्हिजनवर दाखवत होते अन् मला ते फार खटकलं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे वक्तव्य जरी मनोज यांनी केलेलं असलं तरी त्यांनी ते केवळ चाणक्य यांचा संदर्भ देण्यासाठीच केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातून ते कोणालाही योग्य किंवा अयोग्य ठरवू इच्छित नसल्याचंही मनोज यांनी स्पष्ट केलं. मनोज यांना ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त संवाद आणि कथा यावरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्याबद्दल त्यांनी या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.