२०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘गोरखा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट अक्षय आनंद राय यांच्याबरोबर करणार होता. चित्रपटातील अक्षयचा फर्स्ट लूक पाहून सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. गोरखा ही मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावरील कथा आहे. आता मात्र या चित्रपटातून अक्षय कुमार बाहेर पडल्याचं वृत्त समोर येत आहे.

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती. आता मात्र अक्षय या चित्रपटाचा भाग नसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

आणखी वाचा : शाहिद कपूर ओटीटी पदार्पणासाठी सज्ज; आगामी वेबसीरिजचा टीझर शेअर करत म्हणाला “नवं वर्षं…”

हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रानुसार या चित्रपटात मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनाबाबत बऱ्याच वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत, अक्षय कुमारच्या मनात भारतीय सैन्याच्या बाबतीत असलेला आदर आपल्याला ठाऊक आहेच, त्यामुळेच या चित्रपटातील काही गोष्टींमध्ये अजूनही पारदर्शकता नसल्याने आणि काही तथ्य योग्य नसल्याने अक्षयने या चित्रपटातून बाहेर पडायचा निर्णय घेतला असल्याचं म्हंटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी जेव्हा या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं त्यात वापरलेल्या ‘खुकरी’वरूनही बराच वाद आणि संभ्रम निर्माण झाला होता. मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर अक्षय कुमारने तातडीने त्यांना प्रतिक्रियादेखील दिली होती आणि या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळीयाची अत्यंत काळजी घेऊ असं आश्वासनही अक्षयने दिलं होतं. अक्षय कुमारने अजूनतरी या बातमीची पुष्टी केली नाही, पण अक्षयचं या चित्रपटातून बाहेर पडणं कितपत योग्य होतं हे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.