अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त हिंदी सिनेमापुरतं मर्यादित न राहता भारताबाहेरही तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉलीवूडमध्ये स्थिरावत असताना तिने याहीपेक्षा मोठी उंची गाठायचं स्वप्न पाहिलं आणि हॉलीवूडमध्ये तिचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तिच्या कलेच्या जोरावर तिने तिकडेसुद्धा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आज ती यशस्वी अभिनेत्री व उद्योजिका म्हणून ओळखली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर तिने निर्मितीक्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
प्रियांका चोप्राने आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत, तर तिने अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. प्रियांकाचे सहकलाकार अनेकदा तिच्या कामासाठी तिचं कौतुक करताना दिसतात. अशातच प्रियांकाचा सहकलाकार अभिनेता अर्जुन बाजवाने तिच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन बाजवाने अभिनेत्रीचं कौतुक केलेलं पाहायला मिळतं. प्रियांकाबद्दल बोलण्यापूर्वी अभिनेत्याने त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, त्याचे वडील राजकीय नेते स्वींदरजित सिंग बाजवा यांच्या निधनानंतर त्याला पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण गेलं. पुढे तो म्हणाला, “जेव्हा माझ्यासाठी सर्व रस्ते बंद झाले होते तेव्हा दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी मला संधी दिली आणि ‘फॅशन’ या चित्रपटासाठी माझी निवड केली, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन पुढे म्हणाला, “चित्रपटाच्या सेटवर सगळ्यांना माझ्या खाजगी आयुष्यात जे वादळ येऊन गेलेलं त्याची जाणीव होती. तेव्हा माझी सहकलाकार प्रियांका चोप्राबरोबर मैत्री झाली. आम्ही सीनच्यामध्ये वेळ मिळाल्यावर गप्पा मारायचो, त्यावेळी प्रियांकाच्या वडिलांनाही कर्करोगाचं निदान झालं होतं, त्यामुळे तीसुद्धा कठीण परिस्थितीतून जात होती. पण, ती खूप निडर मुलगी आहे; मी कधीच तिला सेटवर रडताना किंवा निराश झालेली पाहिलं नाही.”
अर्जुन बाजवा पुढे अभिनेत्रीचं कौतुक करत म्हणाला, “आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असून एकमेकांप्रति आमच्या मनात खूप आदर आहे. आज तिने तिच्या आयुष्यामध्ये जे काही मिळवलं आहे, त्या सगळ्याची ती हक्कदार आहे; तिने स्वकष्टाने हे सगळं मिळवलं आहे.”
‘फॅशन’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मधुर भंडारकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा, कंगना रणौत, अर्जुन बाजवा, मुग्धा गोडसे, अरबाज खान यांसारखे कलाकार झळकले होते. २००८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.