शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा आगामी चित्रपट 'पठाण' चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे हे दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला होणारा विरोध दिवसागणिक वाढतोच आहे. या चित्रपटाची दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत आणि दोन्ही गाण्यांवरून प्रचंड विरोध आणि टीका होताना दिसत आहे. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे निर्माण झालेला वाद आता वेगळं वळण घेऊ लागला आहे. बऱ्याच लोकांनी ठीकठिकाणी शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचे पुतळे जाळले, तर काहींनी खुद्द शाहरुखलाच जीवंत जाळायची भाषा केली. आता समोर येणाऱ्या माहितीनुसार शाहरुखच्या नावाने त्याचा तेराव्याचा विधीही पार पाडण्यात आला आहे. अयोध्यामधील तपस्वी छावणीचे गुरु परमहंस आचार्य यांनी हे विधी पार पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. आणखी वाचा : "योग्य वेळ येताच आम्ही…" शिझान खानच्या बहीणींची भावाच्या अटकेप्रकरणी पहिली प्रतिक्रिया गुरु परमहंस आचार्य यांनी सर्वप्रथम शाहरुखचा पुतळा जाळला होता, मात्र बरोबर १३ दिवसांनी मंत्रोच्चार करत तेराव्याचा विधी पार पाडण्यात आला आहे. 'आज तक'च्या वृत्तानुसार याविषयी बोलताना ते म्हणाले, "शाहरुखच्या 'बेशरम रंग' या गाण्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आपत्ती होती. आम्ही इतरांच्या धार्मिक भावनांचा आदर करतो, पण उद्या कुणी आमच्या भावनांचा अपमान केला तर ते आम्ही सहन करून घेणार नाही. १३ दिवसांपूर्वी आम्ही शाहरुखचा पुतळा जाळला होता, आज बरोबर १३ दिवसांनी आम्ही जिहादी शाहरुखचा तेराव्याचा विधी पार पाडला आहे." याधीसुद्धा गुरु परमहंस आचार्य यांनी बऱ्याचदा शाहरुख खानचा उल्लेख जिहादी म्हणून केला आहे. आता 'पठाण'च्या वादावरून त्यांनी केलेल्या या कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. नुकतंच कोलकाता चित्रपट महोत्सवात शाहरुख खानने त्याच्या भाषणात त्याच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल खरमरीत स्पष्टीकरण दिलं होतं. शाहरुखचा 'पठाण' २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.