दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. ७०-८० च्या दशकात या ‘हवाहवाई’ने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून प्रत्येकाच्या मनावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली होती. श्रीदेवी तामिळ सिनेमांमध्ये काम करत होत्या तेव्हाच बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते. मात्र, श्रीदेवी यांच्या प्रेमात पडण्याआधी बोनी कपूर यांचं मोना शौरी यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांच लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने झालं होतं.

बोनी कपूर व मोना यांना अर्जुन कपूर आणि अंशुला अशी दोन मुलं होती. यानंतर त्यांच्या आयुष्यात श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि पुढे ते पहिल्या पत्नीपासून कायदेशीररित्या विभक्त झाले. नुकत्याच ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा : “अचानक मालिकेतून काढलं अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “मी खचले…”

बोनी कपूर म्हणाले, “पहिलं लग्न झालेलं असताना, मी पुन्हा प्रेमात पडलो याबद्दल माझ्या मनात कायम अपराधीपणाची भावना आहे. मात्र, अर्जुनची आई म्हणजेच मोनाबरोबर मी कधीही खोटं बोललो नाही. तिला माझ्या मनातील श्रीदेवीबद्दल असलेल्या भावना आधीपासूनच ठाऊक होत्या. एवढंच नव्हे तर, माझं आणि श्रीदेवीचं लग्न होण्याआधी आम्ही सगळे एकत्र राहत होतो.”

हेही वाचा : Video : स्पृहा जोशीचं छोट्या पडद्यावर कमबॅक! ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवी मालिका, सेटवरून शेअर केला खास व्हिडीओ

“आमच्या नात्याबद्दल माझ्या आईला सुद्धा माहीत होतं. एके दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी आईने ओवाळणीचं ताट घेतलं आणि त्यात राखी ठेवली. श्रीदेवीच्या हातात ती आरतीची थाळी ठेवून आईने तिला याला राखी बांध असं सांगितलं होतं. त्यावेळी काय बोलावं हे श्रीदेवीला समजलंच नाही आणि ती रुममध्ये निघून गेली. त्यावेळी मी तिला ‘काळजी करू नकोस आणि त्रास करून घेऊन नकोस हे आरतीचं ताट बाजूला ठेवून दे’ असं सांगितलं होतं. ती खूप जास्त अध्यात्मिक होती त्यामुळे मी सुद्धा अध्यात्मावर विश्वास ठेवू लागलो.” असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

दरम्यान, बोनी कपूर व मोना शौरी यांनी १९८३ मध्ये लग्न केलं होतं. यानंतर १९९६ मध्ये ते दोघं कायदेशीररित्या वेगळे झाले. पुढे त्याच वर्षी बोनी यांनी श्रीदेवीबरोबर संसार थाटला. १९९७ मध्ये अभिनेत्रीने जान्हवी कपूर, तर २००० मध्ये खुशीला जन्म दिला. यानंतर सुद्धा त्या सिनेविश्वात सक्रिय होत्या. २०१८ मध्ये या दिग्गज अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.