फराह खानच्या गाजलेल्या काही गाण्यांपैकी एक म्हणजे ‘शीला की जवानी’ होय. १५ वर्षांपूर्वी २०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘तीस मार खान’ चित्रपटातील हे आयटम साँग प्रचंड व्हायरल झालं होतं. कतरिना कैफने या गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. हे गाणं फराहने स्वतः कोरिओग्राफ केलं होतं. या गाण्यासाठी गायिका सुनिधी चौहानला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला, तर फराहला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी पुरस्कार मिळाला होता.

‘शीला की जवानी’ आता १५ वर्षांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजताना ऐकू येतं. हे लोकप्रिय गाणं फराह खानच्या करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं आहे. होय. फराह खानने स्वतः हा खुलासा केला आहे. फराह या लोकप्रिय गाण्याबद्दल काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.

दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खान तिच्या ताज्या व्लॉगमध्ये अभिनेत्री मानसी पारेखच्या घरी गेली होती. यावेळी तिने मानसीबरोबर तिचा आगामी चित्रपट ‘शुभचिंतक’बद्दल चर्चा केली. मानसीनं सांगितले की हा चित्रपट ५ कोटी रुपयांच्या कमी बजेटमध्ये बनवला गेला आहे. हे ऐकताच फराह म्हणाली, “हा चित्रपट इतक्या कमी बजेटमध्ये तयार केला असेल असं वाटत नाही. कारण सध्याच्या काळात, एका गाण्याचे बजेट तुमच्या संपूर्ण चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त असतं.”

‘शीला की जवानी’ सर्वात स्वस्त गाणं

पुढे फराह म्हणाली, “जेव्हा कोणी मला सांगतं की त्यांनी त्यांचं गाणं मोठ्या बजेटमध्ये बनवलं आहे, तेव्हा मी फार इम्प्रेस होत नाही, कारण मला वाटतं की तुमचे बजेट जितके कमी असेल तितके तुम्ही चांगले विचार करता. माझ्या करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं ‘शीला की जवानी’ आहे.”

फक्त साडेतीन दिवसांत केलं शूटिंग

फराह खानने या गाण्याबद्दल सांगितल्यावर अभिनेत्री मानसी पारेख व स्वप्नील जोशी यांना आश्चर्याचा धक्का बसला. फराह पुढे म्हणाली, “आमच्याकडे त्या गाण्यासाठी कोणताही सेट नव्हता. आमच्याकडे फक्त १० डान्सर होते. आम्ही संपूर्ण गाण्याचं शूटिंग फक्त साडेतीन दिवसांत पूर्ण केलं. हे मी आतापर्यंत केलेलं सर्वात स्वस्त गाणं आहे आणि माझ्या करिअरमधील सर्वात मोठं हिट गाणं आहे. टॉप तीन-चार हिट गाण्यांपैकी एक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे कमी बजेटचे चित्रपट व गाणी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी, अभिनेता राम चरणच्या ‘गेम चेंजर’ची खूप चर्चा झाली होती. कारण निर्मात्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या चार गाण्यांच्या निर्मितीवर सुमारे ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यांमध्ये १००० पेक्षा डान्सर होते, पण हा चित्रपट आणि गाणी दोन्हीही फ्लॉप ठरले.