अभिनेता सैफ अली खान, हृतिक रोशन यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. हृतिक रोशनने साकारलेल्या ‘वेधा’ या भूमिकेचं कौतुक होत आहे. असं जरी असलं तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. नुकतेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा ही आकडेवारी कमी आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन एकच दिवस झाला आहे, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे समीक्षणदेखील चांगले आहे, प्रेक्षक जे चित्रपट पाहून येत आहेत त्यांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच २.९७ कोटी रुपये कमावले होते. प्रेक्षकांनी दिलेल्या समीक्षणाने कदाचित या चित्रपटाला आता फायदा होऊ शकतो. शनिवार, रविवार हे आकडे वाढतील अशी अपेक्षा आहे.

विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”

या वर्षातील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३६ कोटी रुपये कमावले होते. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई ही आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाएवढी आहे. अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ ‘सम्राट पृथ्वीराज’ आमिर खानच्या चड्ढा या चित्रपटांची कमाई विक्रम वेधा चित्रपटापेक्षा जास्त होती. मात्र नंतर या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘विक्रम वेधा’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. ‘विक्रम वेधा’’ भारतात ४००० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा एक मोठा चित्रपट म्हणता येईल. दरम्यान, या बहुचर्चित चित्रपटातील मुख्य अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.