Sunjay Kapur Death: आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कपूर कुटुंबाची लाडकी लेक अभिनेत्री करिश्मा कपूरने ९० चं दशक गाजवलं. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध करणाऱ्या करिश्माचं वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. करिश्माचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. करिश्माने घटस्फोट घेतला तेव्हा संजय कपूरवर गंभीर आरोप केले होते.

करिश्माने २०१४ मध्ये संजयपासून घटस्फोट घ्यायचं ठरवलं. ११ वर्षांच्या संसारानंतर जेव्हा त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली, तेव्हा प्रचंड चर्चा झाली. करिश्मा व संजय कपूर यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात होत्या. करिश्माने तिच्या सासरकडच्या लोकांवर हुंडा आणि मानसिक छळासारखे गंभीर आरोप केले होते.

याचिकेत करिश्मा कपूरने केलेले आरोप

करिश्मा कपूरने घटस्फोटाच्या याचिकेमध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. “संजयचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. ते दोघेही तेव्हा लिव्ह-इनमध्ये राहत होते,” असं करिश्माने म्हटलं होतं. त्याचबरोबर हनीमूनच्या दिवशी संजयने त्याच्या इतर मित्रांबरोबर रात्र घालवण्यास बळजबरी केली होती, असा भयंकर आरोप करिश्माने केला होता. ‘ट्रिब्यून’ने यासंदर्भात वृत्त दिलं होतं.

करिश्माने पैशांसाठी लग्न केल्याचा संजयचा आरोप

करिश्माने संजयच्या मित्रांबरोबर रात्र घालवण्यास नकार दिला, त्यामुळे त्याने तिला बेदम मारल्याचंही तिने सांगितलं होतं. तर दुसरीकडे, करिश्माने फक्त पैशांसाठी आपल्याशी लग्न केलं होतं, असा दावा संजय कपूरने केला होता. करिश्मा ही संजयची दुसरी बायको होती. दोघांनी मोठ्या थाटामाटात २००३ साली लग्न केलं होतं, पण नंतर मात्र हे लग्न अत्यंत विचित्र वळणावर येऊन मोडलं. या जोडप्याला दोन अपत्ये असून घटस्फोटानंतर दोघेही करिश्माबरोबर राहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणधीर कपूर संजयबद्दल काय म्हणाले होते?

करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलीला झालेल्या त्रासाबद्दल व संजयच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. “सगळ्यांना आमची परिस्थिती माहित आहे, आम्ही कपूर आहोत आम्हाला कोणाच्याही पैशांमागे धावायची अजिबात गरज नाही. उलट आमच्याकडे पैशांबरोबर उत्कृष्ट कलाही आहे ज्यामुळे आम्ही आमचं पोट भरू शकतो. संजय कपूर हा अतिशय वाईट माणूस आहे, करिश्माने त्याच्याशी लग्न करावं असं मला मुळीच वाटत नव्हतं. साऱ्या दिल्लीला माहीत आहे की तो कसा आहे, त्यामुळे त्याबद्दल मी आणखी काही बोलणं योग्य नाही,” असं रणधीर कपूर म्हणाले होते.