विजय देवरकोंडा या दाक्षिणात्य अभिनेत्याने ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं. या चित्रपटात विजयबरोबर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेदेखील झळकली. जोरदार प्रमोशन आणि वेगवेगळ्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करूनही ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही खूप मोठा फटका बसला. आता याच चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांना जीवघेण्या धमक्यादेखील येऊ लागल्या आहेत.

लायगर हा चित्रपट सपशेल आपटल्याने निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच चित्रपटाच्या वितरकांचंही खूप नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. नुकसान भरपाईसाठी काही वितरकांनी पुरी जगन्नाध यांच्या घराबाहेर मोर्चादेखील काढायचा ठरवलं होतं. आता यामुळेच पुरी यांना वितरकांकडून जीवघेण्या धमक्यांचे फोन येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल पुरी यांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे. वितरक अशापद्धतीने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना ब्लॅकमेल करू शकत नाही, जर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा असेल तर सिव्हिल कोर्टात केस फाइल करायला हवी असं पुरी यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : “अजूनही तुमच्या रंगाला…” बॉलिवूडमधील ‘या’ गोष्टीबाबत अभिनेत्री कल्की कोचलीनने व्यक्त केली खंत

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार पोलिसांत केलेल्या तक्रारीत पुरी जगन्नाध यांनी वितरकांना त्यांचे पूर्ण पैसे दिले असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी त्यांच्या इतर छोट्या वितरकांना पैसे पुढे न दिल्याने हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचं पुरी यांनी नमूद केलं आहे. पुरी यांच्या कुटुंबालाही वरंगल श्रीनू या वितरकाकडून धोका आहे असंही त्यांनी या तक्रारीत नमूद केलं आहे. हैद्राबादमधील कुटुंबाचा हे वितरक छळ करू शकतात अशी शक्यताही पुरी यांनी वर्तवली आहे.

View this post on Instagram

A post shared by LigerMovie (@ligermovie)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ने पहिल्या दिवशी २५ कोटीची कमाई जरी केली असली तरी नंतर या चित्रपटाची अवस्था फार बिकट होती. करण जोहरने या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती. शिवाय रोनीत रॉय, रम्या कृष्णन हे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसले. पुरी जगन्नाध आणि विजय देवरकोंडा ‘जन गण मन’ या चित्रपटावर काम करत होते, पण आता हा चित्रपट बंद झाला असल्याचं समोर आलं आहे.