Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. या दोघांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पुकार’ सिनेमा २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘पुकार’ सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी माधुरी आणि प्रभुदेवा यांचा ‘हे के सेरा सेरा’ गाण्यावरचा जबरदस्त डान्स डोळ्यासमोर उभा राहतो. या सिनेमात आणखी एका गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे ‘किस्मत से तुम हमको मिले’. हे गाणं बर्फाळ प्रदेशात शूट करण्यात आलं होतं. स्क्रिप्टनुसार माधुरीला बर्फाळ प्रदेशात शिफॉन साडी नेसून या गाण्यासाठी शूट करायचं होतं.
मात्र, या गाण्याच्या शूटिंगदरम्यान कडाक्याच्या थंडीने अभिनेत्रीची अवस्था फार बिकट झाली होती. याचा अनुभव ‘धकधक गर्ल’ व अनिल कपूर यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सांगितला होता. ‘पुकार’मधलं ‘किस्मत से तुम’ हे गाणं अलास्का येथील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये शूट करण्यात आलं आहे.
अनिल कपूर सांगतात, “आम्ही शूटिंगला सुरुवात केली तेव्हा तेथील तापमान मायनस मध्ये होतं. साधारण -३० ते -४० अंश सेल्सिअसमध्ये आम्ही ते गाणं शूट केलंय. त्यावेळी मी वेशभूषेवर अगदी बारकाईने लक्ष दिलं होतं. माधुरीने शिफॉन साडी नेसली होती तर, दुसरीकडे मी कडाक्याच्या थंडीमुळे जवळपास ६-७ स्वेटर घातले होते.” यावेळी त्यांच्या शेजारी बसलेली माधुरी म्हणाली, “यांनी एवढे स्वेटर, जॅकेट, मोठे बूट, मफलर, हातमोजे या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या आणि मी फक्त शिफॉन साडी नेसली होती.”
अनिल कपूर पुढे म्हणाले, “आम्ही शूटिंग सुरू केलं तेव्हा प्रचंड वारा होता पण, अचानक वारा थांबला. शेवटी मी हेलिकॉप्टर उडवा असं सुचवलं.”
पुढे माधुरी म्हणाली, “माझे ओठ निळे पडले होते, चेहरा गोठला…थंडीमुळे माझी हालचाल पूर्ण थांबली, मला लिंप-सिंक करताच येत नव्हतं. मी अक्षरश: गोठून गेले होते. अशातच यांनी ( अनिल कपूर ) हेलिकॉप्टर अजून खाली घे जेणेकरून वारा खूप वाहतोय आणि साडीचा पदर उडतोय असा सुंदर शॉट मिळेल असं टीमला सांगितलं. त्या क्षणाला मी थरथर कापू लागले. आधीच थंडी, त्यात हेलिकॉप्टरमुळे सुटलेला वारा यामुळे आयुष्यात पहिल्यांदाच सेटवर मी जोरजोरात ओरडले…मोठ्याने रडू लागले. मी आता हे करू शकत नाही असं ओरडून सर्वांना सांगितलं. यानंतर युनिटमधील सर्वजण घाबरले होते.”
“त्यावेळी सेटवर डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. कडाक्याच्या थंडीमुळे माझे ओठ निळे झाले होते…अवस्था फार बिकट झाली होती. त्यामुळे पॅकअप करण्यात आलं. मला काहीच सुचत नव्हतं…शेवटी पहिल्या दिवसाचं शूटिंग थांबवण्यात आलं, दिवस वाईट गेला. दुसऱ्या दिवशी त्या थंडीची काहीशी सवय आम्हाला झाली होती, त्यामुळे थोडं जुळवून घेता आलं. सेटवर चादर घेऊन एक व्यक्ती उभी असायची, सीन संपला की, मी चादर ओढून बसायचे. यामुळे नंतर मला काहीसं बरं वाटलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी शूट पूर्ण केलं.” असं माधुरीने सांगितलं.