स्टारडम आणि स्टार पॉवरबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांचं नाव सर्वात आधी येतं. चाहत्यांमध्ये राजेश खन्ना यांची प्रचंड क्रेझ होती, काहींनी त्यांना रक्ताने पत्रे लिहिली, तर काही महिलांनी त्यांच्या फोटोशी लग्न केले होते. लोक त्यांच्या गाडीच्या चाकाखालची धुळ मिळावी यासाठी भांडायचे. राजेश खन्ना यांनी चाहत्यांचं जेवढं प्रेम अनुभवलं, स्टारडम अनुभवलं तेवढं कदाचित इतर कोणत्याही स्टारला मिळालं नाही. राजेश खन्ना यांना स्टारडम, यश टिकवून ठेवता आलं नाही. राजेश खन्ना यांच्यात अहंकार आला आणि पुढे काही वर्षांनी त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. राजेश खन्नानंतर त्यांच्याइतकं अफाट यश मिळवून डोक्यात हवा न जाऊ देता जमिनीवर पाय असलेले एक स्टार म्हणजे अमिताभ बच्चन.
फिल्मफेअरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी या दोन्ही स्टार्समधील फरक सांगितला. तसेच अमिताभ बच्चन यांच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. अमिताभ बच्चन नेहमीच शब्द खूप जपून वापरायचे. तसेच स्टार असल्याची प्रतिमा सांभाळण्यासाठी कायम एका विशिष्ट पद्धतीने वागायचे, असं मौसमी यांनी नमूद केलं.
अमिताभ बच्चन यांची कीव येते कारण…
“अमिताभ बच्चन खूप हुशार आहेत. ते नेहमीच जपून शब्द वापरतात, कधी कधी मला त्यांची दया येते, कारण मला वाटतं की बरेचदा ते फक्त अभिनय करत असतात, कारण त्यांना तेच जमतं. मी चुकीची असू शकते पण मला त्यांच्याबद्दल असंच वाटतं. हे त्यांच्या प्रतिमेमुळे असेल, कारण ते एक मोठे स्टार आहेत आणि त्यांनी जे मिळवलंय, जे इतर कोणीही साध्य करू शकलं नाही,” असं मौसमी चॅटर्जी म्हणाल्या.
अमिताभ बच्चन व राजेश खन्ना कसे वेगळे?
अमिताभ बच्चन हे राजेश खन्नापेक्षा कसे वेगळे आहेत, याबद्दल सांगताना मौसमी म्हणाल्या, “प्रचंड यश मिळाल्यानंतरही अमिताभ यांनी आपली आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यात यश मिळवलं आहे. राजेश खन्ना याच गोष्टीत अपयशी ठरले. ते त्यांच्या यशाने भारावून गेले होते. ‘एक अनपढ गुंडा और एक पढे लिखे गुंडे में बहुत फरक होता है’ (सुशिक्षित व अशिक्षित गुंडात नेहमीच मोठा फरक असतो). मी कधीही अमिताभ बच्चन यांना त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या लोकांबरोबर पाहिलं नाही, पण राजेश खन्ना नेहमीच अशा लोकांमध्ये असायचे, कारण त्यांना लोकांचं अटेंशन हवं असायचं.”

राजेश खन्ना यांच्या करिअरला उतरती कळा लागली, त्याबद्दल बोलताना मौसमी यांनी दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीला यश डोक्यात गेल्यावर खाली पडताना पाहिलं हे खूपच दुःखद होतं. हे भयंकर होतं. एकेकाळी ते यशाच्या शिखरावर होते, तेवढं यश त्यांच्याआधी कोणीही अनुभवलं नव्हतं.”
मौसमी यांनी एकदा एक प्रसंग सांगितला होता, जेव्हा राजेश खन्ना यांनी मौसमी यांच्या मुलीला विचारलं होतं की तिचे वडील जयंत मुखर्जी आहेत की विनोद मेहरा? “अशी अश्लील टिप्पणी करणारे बरेच लोक हे विसरतात की यावरून ते स्वतः कसे आहेत हेच लोकांना दाखवत असतात. ते तशा वातावरणातून आले असतात. कोणी विचार केला नसेल की मी त्यांना उत्तर देईन, पण मी अशीच आहे. तुम्ही सुपरहिरो आहात की सुपर हिरोईन, मला फरक पडत नाही आहात. मी फक्त एक माणूस म्हणून विचार करते. तुम्ही सुपरस्टार असाल किंवा स्पॉट बॉय म्हणून काम करत असाल तरीही तुम्हाला माझ्याकडून सलाम आहे,” असं मौसमी म्हणाल्या होत्या.