Moushumi Chatterjee on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन हे जितके त्यांच्या चित्रपटांमुळे लोकप्रिय आहेत, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केलेले वक्तव्य, जया बच्चन यांच्या प्रतिक्रिया तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांचे नाते, यामुळे बच्चन कुटुंब सातत्याने चर्चेत असते.

अनेकदा रेखा, जया व अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलले जाते. काही वेळा त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलासा करतात. आता अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

मौसमी चॅटर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘रोटी कपडा और मकान’, ‘बेनाम’ आणि ‘मंजील’ या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. मात्र, जेव्हा ‘बरसात की एक रात’ या चित्रपटासाठी शक्ती सामंत यांनी या जोडीला पुन्हा कास्ट केले, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी मौसमी चॅटर्जी यांना चित्रपटातून बाहेर काढले होते.

मी इतरांशी चांगले वागते आणि मलासुद्धा…

अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी नयनदीप रक्षित यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “शक्ती सामंत यांचा ‘बरसात की एक रात’ हा चित्रपट होता. एक दिवस शक्ती सामंत माझ्याकडे आले. ते मला म्हणाले की, तुझे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भांडण झाले आहे का? मी त्यांना म्हणाले की, मी कोणाच्याही इतकी जवळ नाही की आमच्यात भांडण होईल. मी इतरांशी चांगले वागते आणि मलासुद्धा तसाच प्रतिसाद मिळतो.

शक्ती सामंत म्हणाले तीच तर खरी समस्या आहे. अनेक हिरो म्हणतात की मौसमीला चित्रपटात का घेतलं? तिच्याबरोबर ट्युनिंग चांगली नाही. तुला समजले का ट्युनिंग म्हणजे काय? त्यावर मी त्यांना म्हणाले की, कदाचित आता कळत आहे. मैत्रीपेक्षा जास्त नाते त्यांना अपेक्षित असेल. पण, मी चित्रपटसृष्टीत मैत्री करण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आले आहे. त्यानंतर शक्ती सामंत यांनी मला त्या चित्रपटातून काढून टाकले. मी त्यांना म्हणाले, आधी जे मानधन दिले आहे ते मी परत करते. त्यावर ते म्हणाले की, ते तुझ्याजवळ ठेव. मी पुढचा चित्रपट तुझ्याबरोबर करेन, त्यामुळे ‘आनंद आश्रम’ हा चित्रपट केला. मला समजले की, त्या काळातील यशस्वी नटाबरोबरचे नाते ते बिघडवू शकत नव्हते. ‘बरसात की एक रात’मध्ये राखी गुलजार प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या.

त्यानंतर मौसमी व अमिताभ बच्चन यांनी पुन्हा २०१५ साली एकत्र काम केले आहे. ‘पिकू’ या चित्रपटात मौसमी चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “जेव्हा मी पिकू चित्रपटात त्यांच्याबरोबर काम केले, तेव्हा ते वेळ पाळत असल्याचे जाणवले. आताच्या पिढीने अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.”

एकदा मौसमी चॅटर्जी यांनी पापाराझींनी त्यांना जया बच्चन म्हटल्यानंतर जे उत्तर दिले होते, त्यानंतर वाद निर्माण झाला होता. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या होत्या, मला जया बच्चन म्हणू नका. मी चांगली व्यक्ती आहे. आता या मुलाखतीत या वादावर त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “मला तुलना केलेली आवडत नाही. पापाराझी कधीकधी त्रास देतात, त्यांना ऐकून घ्यायचे नसते. मला वाटते की जया बच्चनपेक्षा मी चांगली व्यक्ती आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जया बच्चन व त्यांच्यात ७० च्या दशकात स्पर्धा होती का? यावर मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “जया बच्चन व माझ्यात स्पर्धा होती. माझे कुटुंब श्रीमंत होते, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी मला पैशांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. पण, काही लोक लहान घरात राहतात, नंतर त्यांना मोठी घरे पाहिजे असतात.”