Rahul Dev recalls brother Mukul Devs last days: अभिनेते मुकुल देव यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांनी बॉलीवूडसह दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ‘वजूद’, ‘किला’, ‘दे ताली’, ‘दस्तक’, ‘कोहराम’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले.
आता मुकुल देव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ राहुल देव यांनी केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे. राहुल देव यांनी एका मुलाखतीत मुकुल देव यांचे शेवटचे दिवस कसे होते, यावर वक्तव्य केले आहे.
राहुल देव काय म्हणाले?
राहुल देव यांनी इ-टाइम्सबरोबर संवाद साधला. राहुल देव म्हणाले, “त्याच्या निधनाच्या आठ दिवस आधी त्याला दवाखान्यात दाखल केले होते. त्याच्या खाण्याच्या वाईट सवयींमुळे तो आजारी होता. त्याच्या मृत्यूच्या चार-पाच दिवस आधीपासून त्याने खाणे बंद केले होते. त्याला खूप एकटे वाटत होते. त्याची जगण्याची इच्छा संपली होती. मी त्याला अनेकदा अभिनय क्षेत्रात परत येण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, त्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या.
राहुल देव पुढे म्हणाले, “मुकुल २०१९ मध्ये आमच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीला गेला होता, ते आजारी होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. २०२३ मध्ये आमच्या आईचे निधन झाले. वडिलांच्या निधनातून मुकुल कधीच सावरू शकला नाही. मुकुलचा घटस्फोट झाला होता. त्याची मुलगी त्याच्याबरोबर राहत नव्हती, या गोष्टीचा त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. तो एकांतवासात राहू लागला. त्याने स्वत:ची काळजी घेणे बंद केले होते.
अनेकांनी मुकुल देव नैराश्यात असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राहुल देव म्हणले, “जे लोक मुकुल नैराश्यात होता, त्याची प्रकृती ठीक नव्हती असे म्हणत आहेत. तेच लोक त्याच्या संपर्कात राहिले नाहीत. त्याच्या शेवटच्या दिवसात त्याची भेट का घेतली नाही. मुकुलला एकटे पडल्यासारखे वाटत होते. २०१९ ते २०२४ या दरम्यान कोण खरंच त्याच्या संपर्कात होते? ते त्याला भेटण्यासाठी दवाखान्यात का आले नाहीत. ते त्याच्या शोकसभेत का हजर नव्हते? त्याचे दोन चित्रपट येत्या काही काळात प्रदर्शित होणार होते. त्याने ‘सन ऑफ सरदार’चे शूटिंग इंग्लंडमध्ये केले आहे. जर एखादी व्यक्ती तंदुरुस्त नसेल तर कोणीही त्याला कास्ट करणार नाही.”
राहुल देव असेही म्हणाले, मी ज्यावेळी त्याला त्याच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सांगितले, तेव्हा त्याने मला टाळले. तो देखणा होता, पण त्याने कधीही दुसरे लग्न करण्याचा विचार केला नाही. माझा भाऊ बिचारा नव्हता, मी त्याला त्याच्या उत्साही व्यक्तिमत्वासाठी लक्षात ठेवेन.
राहुल देव यांनी खुलासा केला की त्यांनी त्यांच्या पत्नी, आई-वडील आणि आता भावाला गमावले आहे. दरम्यान, राहुल देव यांनी बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.