कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिक व कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर गेल्यावर्षी २०२३मध्ये ‘भूल भुलैया ३’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे. अनीज बज्मी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अशात कार्तिक आर्यनने ‘भूल भूलैया ३’ चित्रपटात कोण मंजुलिका असणार आणि कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. मी विद्या बालन हिचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘भूल भूलैया ३’ यंदाच्या दिवाळीत धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विद्या बालन आणि कार्तिक ‘मेरे ढोलना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “याची अन् नटरंगची कथा… “, ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटाबद्दल मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

विद्याला पुन्हा या भूमिकेत पाहून प्रेक्षक फारच खुश झाले आहेत. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केले होते, अन् आता तिसरा भागदेखील तेच दिग्दर्शित करणार आहेत. इतक्या वर्षांनी विद्याला पुन्हा ‘भूलभुलैया ३’मध्ये घेण्यामागील प्रयोजन काय याबद्दल अनीस यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘झुम’शी संवाद साधताना अनीस बाजमी म्हणाले, “विद्याने माझ्या ‘थॅंक यु’ चित्रपटात केवळ ३ दिवसांच्या भूमिकेसाठी होकार दिला होता. मला आजही आठवतं मी तिला भूमिकेसाठी विचारतो अन् ती अजिबात दिरंगाई न करता होकार देते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत विद्याने कधीच मला नकार दिलेला नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “विद्या या भूमिकेत अगदी शोभून दिसते अन् पहिल्या भागातील तिचे काम अप्रतिम झाले होते. म्हणूनच मी या तिसऱ्या भागात पुन्हा तिला घ्यायचा निर्णय घेतला आहे.” अद्याप अनीस यांनी चित्रीकरणाची तारीख निश्चित केलेली नाही पण लवकरच ‘भूलभूलैया ३’चे चित्रीकरण सुरू होणार असल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भूलैया’मध्ये अक्षय कुमारसह विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. पण चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. तर तब्बू व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकल्या.