सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच अवघ्या मनोरंजन विश्वासालाच दुःखद धक्का बसला. काल (२२ सप्टेंबर) राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कलाविश्वातील काही मंडळी यावेळी उपस्थित होती. तर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्याबाबत खास ब्लॉग लिहिला आहे.

“लहानपणापासून अमिताभ बच्चन माझे आदर्श आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा अमिताभ यांची नक्कल करूनच मी माझं पोट भरलं आहे.” असं राजू श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आता अमिताभ आपल्या या लाडक्या कलाकाराबाबत भरभरून बोलले आहेत.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?
“आणखी एक सहकारी, मित्र व सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला. अचानक एका आजाराने त्याला गाठलं आणि त्याचं अकाली निधन झालं. त्याची विनोदबुद्धी आणि जन्मतः त्याच्याकडे असलेली कला नेहमीच आपल्याबरोबर राहील. स्पष्ट, नेहमीच हसत राहणारा परिपूर्ण असा हा कलाकार होता. आता स्वर्गातही तो हसत असेल. तसेच देवालाही हसवत राहील.” असं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – कुटुंबीय, चाहत्यांची गर्दी जमली पण…; राजू श्रीवास्तव यांचा भाऊ अंत्यसंस्काराला पोहोचलाच नाही, यामागचं कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे म्हणाले, “तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून तुम्ही व्हॉईस नोट आम्हाला पाठवा असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून मला सांगण्यात आलं. मी तेदेखील केलं. त्याला माझा आवाज ऐकवण्यात आला. माझा आवाज ऐकल्यानंतर काही वेळासाठी त्याने डोळे उघडले. पण नंतर डोळे त्याने बंद केले.” खरं तर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान राजू श्रीवास्तव यांना बिग बींचा आवाज ऐकवला जात होता. याबाबत आता त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे.