करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाले अशी अपेक्षा सगळ्या प्रेक्षकांना असेल. मात्र, करोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सगळ्यांवर होतं आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा सगळी चित्रपटगृह, थिएटर आणि मल्टीप्लेक्स सगळ्यांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या सगळ्याचा फटका हा बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रनौतला आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला बसणार आहे.

चित्रपट प्रदर्शनाची ही बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना निराशा झाली आहे. या सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी देखील ही निराशाजनक बातमी आहे. तर सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट नंतर प्रदर्शित केल्यास बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल अशी आशा आहे. तर, आताची परिस्थिती पाहता निर्माते पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या माहितीनुसार, “नवीन निर्बंधांचे पालन फक्त एक शहर करणार नाही तर संपूर्ण राज्य करणार आहे. हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शवर महाष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे कंगना रनौतचा ‘थलायवी’, सलमानचा ‘राधे’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटांना फटका बसला आहे. प्रदर्शनाची तारिख बदलली तर बरं होईल,” असे चित्रपटसृष्टीतील एका व्यक्तीने सांगितले आहे.

‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. या चित्रपटात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी आणि रणदीप हूड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘थलायवी’ चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजयने केले आहे.