‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डॉ. अमोल कोल्हे आता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याच्या तयारी असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याविषयी भाष्य केलं आहे.

मुलाखतीमध्ये अमोल कोल्हेंना विचारण्यात आलं की, तुम्ही अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहात असं आता समजायचं का? या प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले, “नाही, नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला हे कळलं असेल की हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील, तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे. त्यामुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल. कारण मायबाप जनतेनं ठरवलंय की, या पद्धतीनं पुन्हा विश्वास माझ्यावर ठेवायचा आणि त्यासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी मला वाटतं की हे प्रश्न आधी मार्गी लागणं. शिरुर मतदार संघातील, महाराष्ट्राच्या संदर्भातले, माझं जास्त प्राधान्य या गोष्टीला असेल.”

हेही वाचा – अखेर ‘त्या’ फोटोमागचं सत्य आलं समोर, नव्या घराच्या कागदपत्रावर प्राजक्ता माळीच्या सह्या नव्हे तर…; प्रवीण तरडेंशी आहे त्याचं कनेक्शन

पुढे अमोल कोल्हेंना विचारलं की, पुढचे काही दिवस अमोल कोल्हे हे स्क्रिनवर दिसणार नाहीत? किंवा तुम्ही हा ब्रेक काही दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी घेत आहात? यावर अमोल म्हणाले, “नाही. यामध्ये कसं होतं की हे फूलटाइम प्रोफेशन आहे. मी जसं म्हणालो की, यामध्ये काही गोष्टी आपण शिकतो. त्या पद्धतीनं मी हे जे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अभिनय क्षेत्रातून ब्रेक जरी घेतला तरी आता शिरुर लोकसभा मतदार संघाचे प्रश्न सोडवणं याला माझं प्राधान्य राहिल. त्यामुळे अभिनय क्षेत्रातून तो ब्रेक घ्यावा लागली तरी त्याला माझी काहीच हरकत नाही.”

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दिलं चाहत्यांना सरप्राइज, काय ते? पाहा…

मग त्यांना विचारलं की, अमोल कोल्हेंनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतला असं आम्ही म्हणू शकतो? याविषयी अमोल कोल्हे म्हणाले, “काही दिवसांसाठी नाही तर पाच वर्षांसाठी म्हणावं लागेल. कारण ही पूर्ण कमिटमेंट आहे. ही पूर्ण कमिटमेंट शिरुर लोकसभा मतदार संघाशी आहे आणि या पूर्ण कमिटमेंटमुळे ती कमिटमेंट करावीच लागेल. यामध्ये अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोहोचवणं हे जे एक प्राधान्य असेल. हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रिनवर पाहाल असं मला वाटत नाही.”