अभिनेत्री अमृता सुभाष लवकरच ‘जारण’ या तिच्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तिच्यासह अभिनेत्री अनिता दाते महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी दोघींनी ‘गांधा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ‘जारण’ या चित्रपटातून दोघी पुन्हा एकत्र काम करीत आहेत. तर नुकतीच दोघींनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली होती.
अमृता सुभाष अनेकदा सोशल मीडिया, तसेच मुलाखतींमार्फत तिची मतं ठामपणे मांडत असते. अशातच नुकतीच तिनं ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं तिच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. तिनं तिला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली की, चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिनं मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली होती. ‘जारण’ हा चित्रपट रहस्य, गूढ व अघोरी परंपरा यांवर आधारित आहे. या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “कुठलंही भय एका वेदनेतून जन्म घेत असतं,असं मला नेहमी वाटतं. त्याच्या आतल्या दुखाची आपल्याला भीती वाटत असते आणि आपण त्यापासून दूर पळत असतो.”
“भूमिकेला नीट समजून घेण्याकरता मी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली. याबाबत मी हृषिकेशलाही (‘जारण’ चित्रपटाचे दिग्दर्शक) सांगितलं होतं.” अमृता सुभाषचा ‘जारण’ हा चित्रपट येत्या ६ जूनला प्रदर्शित होणार आहे. हृषिकेश गुप्ते यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन व लेखन केलं आहे. या चित्रपटात अमृता सुभाष, अनिता दाते, सीमा देशमुख, राजन भिसे यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
दरम्यान, अमृता सुभाषच्य कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांत काम करीत तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. आजवर तिनं ‘शास्त्री विरुद्ध शास्त्री’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘वाँडर वूमन’, ‘गल्ली बॉय’, ‘दिठी’, ‘ती आणि इतर’ यांसारख्या अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केलं आहे. परंतु, ‘लस्ट स्टोरीज २’ या वेब सीरिजमुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. तर, सध्या ती ‘जारण’ व ‘चिडियां’ या आगामी चित्रपटांतून झळकणार आहे.