मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. ९० च्या दशकात वर्षा उसगांवकर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपली छाप सोडली. मार्च २००० मध्ये वर्षा उसगांवकर यांनी अजय शर्मा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबाबतचा किस्सा सांगितला आहे.
काही दिवसांपूर्वीच वर्षा उसगांवकर यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे लग्न कसे जमले, याबाबतचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, माझं लग्न साध्या पद्धतीने व्हावं अशी माझी इच्छा होती. मला रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे होते, पण माझ्या नातेवाईकांनी याला मान्यता दिली नाही. गोव्यात बहिणीच्या घरी माझं लग्न झालं. माझ्या बहिणीचे घर खूप मोठे व नदीकाठी आहे. २०० माणसांच्या उपस्थितीत माझं लग्न पार पडलं. त्यावेळी माझ्या लग्नाची फारशी चर्चा झाली नाही, त्यामुळे आजही अनेकांना मी अविवाहित आहे असंच वाटतं.”
त्या पुढे म्हणाल्या, “मला लवकर लग्न करायचं नव्हतं, म्हणून माझ्या आई-वडिलांनी माझ्या दोन्ही लहान बहिणींची लग्न लावून दिली. एकदा आई-वडिलांनी माझ्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्यानंतर मी त्यांना माझ्यासाठी मुलगा शोधायला सांगितला. मला कलेची आवड होती, त्यामुळे कलेची जाण असणाऱ्या घरातच त्यांनी मला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संगीतकार रवी शंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मा यांचं स्थळ मला आलं. १० वर्षाअगोदर आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यामुळे लग्नानंतर माझ्या सासरच्या लोकांना माझ्या अभिनय क्षेत्राबाबत कोणतीही तक्रार नव्हती.”
वर्षा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास हमाल दे धमाल, अफलातून, सवत माझी लाडकी, गंमत जमंत, बायको चुकली स्टॅंडवर चित्रपटांमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. तर हिंदीत त्यांनी साथी, परदेसी, घरजमाई चित्रपटात काम केले. सध्या त्या सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेली माई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.