मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ५८ वर्षांचे होते. नितीन देसाई यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. याबद्दल कलाकार दुःख व्यक्त करत असून त्यांनी आत्महत्या करणं हा खूप मोठा धक्का आहे असं म्हणत आहेत. आता याबद्दल अभिनेता सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध भावे आणि नितीन देसाई यांची अनेक वर्षांपासूनची ओळख होती. सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटाचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं होतं.

आणखी वाचा : Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना सुबोध भावे म्हणाला, “नितीन देसाई लढवय्या होता. अनेक कठीण प्रसंगांना तो सामोरा गेला होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या स्टुडिओला आग लागली, त्यातूनही तो बाहेर पडला. त्यामुळे नितीन संकटांनी डगमगून जाणारा कधीच नव्हता. मोठी स्वप्न बघायची आणि मेहनत करून ती स्वप्न साकार करायची हे आम्ही कलाकार नितीनकडे पाहून शकलो. प्रभातच्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा नितीन हा एकमेव निर्माता होता. अनेक उत्तमोत्तम कलाकृतींचा तो एक भाग होता आणि त्याच्या कलादिग्दर्शनाने त्या कलाकृती पडद्यावर आणखीन सुंदर दिसायच्या. इतकी सुंदर चित्र घडवणारा आमच्या मित्राने स्वतःचं आयुष्य असं बेरंग का केलं याचं उत्तर माहीत नाही. तो कधीही स्वतःच्या अडीअडचणी बोलून दाखवायचं नाही. तर आम्हाला भेटल्यावर तो मोठी स्वप्न दाखवायचा. आताही एका सिरीजवर त्याचं काम सुरू होतं. खूप काम केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वयोमानानुसार थकवा दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यामागे एवढं मोठं काही असेल असं मला वाटलं नव्हतं.”

हेही वाचा : “कायम हसतमुख आणि…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सुबोध भावेने जागवल्या जुन्या आठवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सुबोध म्हणाला, “‘बालगंधर्व’ या चित्रपटाचं कला दिग्दर्शन त्याने केलं होतं आणि तो नसता तर ‘बालगंधर्व’ चित्रपट होऊ शकला नसता असं मला वाटतं. त्या चित्रपटाच्या वेळी झोकून देऊन काम करताना मी त्याला पाहिलं आहे. त्याच्या कामाविषयी मला खूप अभिमान आणि आदर वाटायचा. आपल्या मराठी मित्राने इतकं मोठं काम केलंय यासाठी मला खरोखर त्याचं खूप कौतुक वाटायचं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीचं लग्न झालं. अत्यंत थाटामाटात त्याने मुलीचं लग्न लावून दिलं होतं. त्या लग्नाला मी गेलो होतो. तेव्हा नितीन भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या. आपली मुलगी चांगल्या घरी जात आहे याचा त्याला खूप आनंद होता आणि तो त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता. आता त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल राग आला तरीही तो त्याच्यापुढे व्यक्त करता येणार नाही.”