Tushar Ghadigaonkar Death : लोकप्रिय मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने शुक्रवारी (२० जून) आत्महत्या केली. मराठी एकांकिका, नाटक, मालिका व चित्रपटातून विविध भूमिकांमधून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तुषारच्या आत्महत्येनंतर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी व त्याच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करीत त्याला श्रद्धांजली वाहिली. तसेच काही कलाकारांनी तुषारच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्याबद्दलच्या अनेक पोस्ट शेअर केल्या.

अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी या घटनेबद्दल सविस्तर पोस्ट लिहून, त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. तसेच विशाखा यांनी त्यांच्या पोस्टमधून कलाकारांच्या आर्थिक मदतीबद्दलचे काही मुद्देही उपस्थित केले आहेत. आर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी आणि त्यासाठी फंड असावा, असा विचारही त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे. तसेच नाटक-सिनेमांसाठी जसं अनुदान मिळतं, तसंच अशा काही कलाकारांसाठी योजना असावी, असं मतही व्यक्त केलं आहे.

तुषारनं आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचं विशाखा यांना कळलं होतं. पण, त्यांच्या एका मित्रानं याबद्दल योग्य ती माहिती दिल्यानंतर विशाखा यांनी ही पोस्ट एडिट केली. त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, “रंगभूमी बळ देते… असं म्हणता म्हणता वाईट बातमी, तुषार घाडीगावकर या रंगकर्मीची! खरं तर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे. अभिनयकडून अनेकदा त्याचं नाव ऐकलेलं. भेटलेही होते, एकत्र काम नव्हतं केलं; पण भयानक वाईट घडलं. हीच ती वेळ असते, ज्या वेळी बोलायला हवं, मार्ग निघतो.”

विशाखा सुभेदार फेसबुक पोस्ट

नंतर त्या म्हणतात, “मंडळी क्षमस्व! मला जी माहिती मिळाली, ती आर्थिक अडचण अशी होती; पण ते कारण नाहीय, हे आताच एका निकटवर्तीय मित्रानं सांगितलं. त्याबद्दल मित्रा मला माफ कर. तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते वाईट झालं. सांगोवांगी जे कानावर पडलं, त्यामुळे शेअर करावंसं वाटलं; पण तरीही माझा मुद्दा खोडावा, असं वाटत नाही. कलाकारांना आर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी यासाठी फंड करावा, असं खूप वाटतं. नंतर ते पैसे कमवून त्यांनी फेडावं. सोसायटीमधून कसं लोन घेता येतं, अगदी तसाच काहीसा कलाकार फंड करावा. त्याची काहीतरी सिस्टीम असावी. परतफेडीचे नियम, नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा.”

पुढे त्यांनी म्हटलं, “रंगमंच कामगार संघटना आहे, ज्युनियर कलाकारांसाठी त्यांची संघटना आहे. संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांचं होत नाही. कारणं माहीत नाहीत. काही मित्र-मैत्रिणी मदतही करतात; पण नंतर तेही पाठ फिरवतात आणि त्याला दोषीही काही कलाकार आहेत, जे पैसे घेऊन गायब होतात. त्याच पैशांची दारू पितात. हे अनेकांनी अनुभवलं असेलच. हे दुष्टचक्र आहे; पण तरीही यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. ताकद, बळ, द्यायला हवं.”

नंतर विशाखा पोस्टमध्ये म्हणतात, “हातात काम नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारात्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जातं. आमचं क्षेत्र बेभरवशाचं. त्यामुळे या परिस्थितीतून प्रत्येकाला जावंच लागतं. साहित्य, नाट्य संमेलनासाठी फंड दिला जातो; त्यातूनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का? किंवा जसं नाटक, सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं; तसं कलाकार (प्रामाणिकपणा पडताळून घ्यावा हवं तर) जगावा, यासाठी वरदान/जीवदान अशी काही स्कीम करता येईल का? एक भाबडा विचार.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे विशाखा यांनी म्हटलं, “या विचारालाही अनेक फाटे फुटतीलच; पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल. पटतंय का कलाकार मित्र-मैत्रिणींनो? ही वेळ कोणावरही येऊ शकते. पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया. स्वतःचा संसार चालवणं हे ज्याचं-त्याचं कामं आहे; पण टेकू तर देऊच शकतो. त्यासाठी आपण काहीतरी स्कीम किंवा तरतूद करू शकतो का?” दरम्यान, विशाखा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी त्यांच्या मताला सहमतीही दर्शवली आहे.