हिंदी चित्रपटांमधून स्त्री व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथा सांगणारे चित्रपट मोठय़ा प्रमाणावर सादर झाले आहेत. यात झोया अख्तर, मेघना गुलजार, रीमा कागती, अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे, अश्विनी अय्यर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. चित्रपटांमधून स्त्रियांच्या कथा, त्यांचे जीवन मांडायलाच हवे, असा आग्रह झोया अख्तर हिने सातत्याने धरला आहे. हिंदी चित्रपटांमधून गेल्या अनेक वर्षांत लैंगिक संबंध किंवा एकूणच लैंगिकतेचे पूर्णपणे चुकीचे चित्रण करण्यात आले. केवळ बळजबरीने घेतलेला संभोग, बलात्कार अशा घटनांवर भर देताना मुळात एकमेकांच्या सहमतीतूनही लैंगिक संबंध निकोप पद्धतीने ठेवता येतात, हे कधीच दाखवले गेले नाहीत, अशी खंत झोया अख्तर हिने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

हिंदी चित्रपटांमधून ज्या पद्धतीने लैंगिकतेचं चित्रण केलं आहे त्यात जास्तीत जास्त भर हा स्त्रियांचा शारीरिक छळ, बलात्कार, त्यांच्याशी छेडछाड या गोष्टींच्याच चित्रणावर राहिला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडतो. हिंदी चित्रपटांतून लैंगिक संबंधांचे चित्रण चुकीचे दाखविले गेले आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री-दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मुंबईत केले.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि स्क्रीनरायटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वुमेन शेपिंग द नरेटिव्ह इन मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपली मतं परखडपणे व्यक्त केली.

चित्रपटातून ज्या गोष्टी दाखवल्या जातात, त्याचा थेट परिणाम मुलांपासून मोठय़ांवर होतो. अगदी कमी वयात तुम्ही जेव्हा असा आशय पडद्यावर पाहता तेव्हा त्याचा तुमच्या मनावर नेमका काय परिणाम झाला आहे हे नंतर खूप वर्षांनी लक्षात येते, असे सांगून त्या म्हणाल्या, मला स्वत:ला खूप वर्षांनी हे लक्षात आलं. मोठी होईपर्यंत हिंदी चित्रपटातून मी फक्त स्त्रीची शारीरिक छळवणूक होतानाच पाहिली आहे. आम्हाला बलात्कार, स्त्रियांची छेडछाड-निंदानालस्ती पाहण्याची मुभा होती, मात्र स्त्री-पुरुषांमध्ये प्रेमाने किंवा एकमेकांच्या सहमतीने लैंगिक संबंध येत असल्याचे चित्रण पाहण्याची परवानगी मात्र नव्हती. याचा खरोखरच तुमच्या मनावर खूप परिणाम होतो, कारण लोक एकमेकांना जवळ घेतायेत, चुंबन देतायेत, त्यातला हळूवारपणा, त्यांचं एकमेकांवर प्रेम करणं आणि त्यातून लैंगिक सुख अनुभवणं, त्यात त्यांनी एकमेकांना कशा पद्धतीने वागवलं पाहिजे, हे तुम्ही काहीच पाहिलेलं नसतं.

मुळात स्त्री-पुरुषांमध्ये प्रेमभावना असते हेच अशा प्रकारच्या चित्रणातून आपण विसरून गेलो आहोत. स्त्री नको म्हणत असतानाही पुरुष जबरदस्तीने आपली इच्छा पूर्ण करतो, अशा चित्रणातून चुकीचा संदेश जातो त्यामुळे त्याचा परिणाम वाईट होणारच. तुम्ही लहान असता तेव्हा त्या प्रसंगांकडे फारसं लक्ष देत नाही, पण जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा त्यातला विचित्रपणा लगेच जाणवतो आणि हे बदलायला हवं, ही भावना तुमच्या मनात घर करते, असंही झोयाने स्पष्ट केलं.

अत्यंत कट्टर स्त्रीवादी असलेल्या कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. माझे पुरुष मित्र, इंडस्ट्रीतील आणि बाहेरचे पुरुष सहकारी सगळेच कट्टर स्त्रीवादी होते. त्यामुळे लैंगिकता म्हणजे काय हे कळायला आणि ते समजायला मला खूप वेळ लागला, कारण ती माझ्या जगात अस्तित्वातच नव्हती. अनेकदा अशा कित्येक गोष्टी मी त्यावर व्यक्तच न होऊ शकल्यामुळे हातून निसटून गेल्या, असा स्वानुभवही झोयाने सांगितला. हे सगळंच चित्र बदलायचं असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांच्या गोष्टी सांगणारे, त्यांच्या व्यक्तिरेखांना प्राधान्य देणारे चित्रपट रुपेरी पडद्यावर यायला हवेत, ती आजच्या काळाची सर्वात जास्त गरज असल्याचे तिने सांगितले.

पुरुष व्यक्तिरेखा जगात जशा असायला, दिसायला हव्यात त्यांचंही तसेच स्त्रियांच्या व्यक्तिरेखांचे चित्रण माझ्या चित्रपटातून मी करत असते. स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर समाजमनावर प्रभावी ठरणारं चित्रपटाचं माध्यमच बदलायला हवं आणि त्यासाठी निर्माता-दिग्दर्शक अशा नानाविध पद्धतीने स्त्रियांच्या गोष्टी चित्रपटातून लोकांसमोर आणणं हीच काळाची गरज असल्याचेही तिने ठामपणे सांगितले.