बॉलिवूडच्या बहुचर्चित १०० कोटी क्लब म्हटलं की नेहमीच सलमान, शाहरूख, अजय आणि अक्षय यांच्याच नावाची चर्चा होते. आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका पडद्यावर जिवंत करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव मात्र या १०० कोटींच्या क्लबमध्ये आलं नाही. बॉलिवूडमधल्या तीन बड्या खानांचीच मक्तेदारी असलेल्या या १०० कोटी क्लबवर नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिलीय. “१००-२०० कोटी मोजायला मी काही अकाऊंटंट नाही”, असं नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटलंय.

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने ही प्रतिक्रिया दिलीय. इतकंच काय तर बॉलिवूडमधल्या इनसाइडर आणि आउटसाइडर या वादाच्या विषयावर देखील मनमोकळ्यापणाने बोलताना दिसला. ‘मंटो’, ‘ठाकरे’,’किक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या स्पष्टवक्तपणामुळे सुद्धा ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या इनसाइडर आणि आउटसाइडर या वादाच्या विषयावर बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर इनसाइडर तुम्हाला स्वतः बोलवतात आणि काम देतात. फिल्म इंडस्ट्रीत टॅलेंटला खूप महत्त्व आहे. आउटसाइडर सुद्धा इनसाइडर बनतात, पण त्यासाठी तुमच्याकडे कला असणं गरजेचं आहे. राहिला १००-२०० कोटी क्लबचा विषय, तर मी कोणी अकाऊंटंट नाही जो १००-२०० कोटी रूपये मोजत बसेल…अभिनय करणं आणि दमदार परफॉर्मन्स करणं हे माझं काम आहे.”

जे अकाऊंटंट असतात ते १००-२०० कोटी रूपये मोजत बसतात, असं नवाजुद्दीनने म्हटलंय. “तसंच १००-२०० कोटीने अभिनय उत्तम होत नाही. छोट्या चित्रपटांमध्ये सुद्धा कमालीचे अभिनय पहायला मिळतात. बड्या चित्रपटांत हव्या तशा दर्जाचे अभिनय नसतात. माझं काम अभिनय करणं हे आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी कधी फ्लॉप होत नाही. मी प्रत्येक चित्रपटाच्या यशानंतर माझी किंमत वाढवतो आणि मेहनत करतो.”, असंही नवाजुद्दीन सिद्दीकीनं म्हटलंय.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचं नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. त्याने आपल्या करिअरमध्ये आपल्या दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलीय. त्याला जी भूमिका मिळत गेली ती भूमिका तो जगत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेल्या स्ट्रगलमुळेच तो यशाच्या शिखरावर पोहोचलाय. बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला होता. दमदार अभिनय आणि टॅलेंट असूनही केवळ त्याच्या लूकमुळे सुरवातीला त्याला हवं तस यश मिळत नव्हतं. पण नंतर त्याने दिवस-रात्र एक करत अखेर बॉलिवूडमध्ये आपली ओळख तयार केली.